महाराष्ट्रतील मंदिरे सुरु करण्यासाठी आळंदीत भाजपचे भजनांदोलन
महाबुलेटीन न्यूज
आळंदी / प्रतिनिधी : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने बार, हॉटेल्स सुरु झाली. पण मंदिरे अद्यापही बंदच आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेत मंदिरे उघडण्यासाठी भाजपने लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. त्यापार्श्वभूमीवर आज मंगळवारी (दि.१३)आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर दर्शनास उघडण्याचे मागणीसाठी भजन आंदोलन करण्यात आले.
भाजपच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे सह संयोजक अध्यक्ष संजय महाराज घुंडरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश सरचिटणीस श्रीकांतजी भारतीय , जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी वारकर्यांचे श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिरासमोरील महाद्वार चौकात आज कमला एकादशीच्या दिवशी हैबतबाबा पायरी जवळ भजन आंदोलन करून निदर्शने केली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील मंदीरे १७ मार्चपासून बंद आहे. गेल्या सात महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे आळंदीतील अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल आळंदीमध्ये होत असते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. त्यामुळे व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान, त्याचबरोबर इथे काम करणाऱ्या कामगारांची उपासमार थांबवण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर सुरु करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.