आळंदीत कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर १० दिवस संचारबंदी
६ ते १५ डिसेंबर दरम्यान संचारबंदी लागू
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी : पंढरपूरच्या कार्तिकी यात्रे प्रमाणेच आळंदीतील कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी रविवार दिनांक ६ डिसेंबर पासून ते १५ डिसेंबर पर्यंत लागू करण्यात आली असून ही संचारबंदी आळंदी पंचक्रोशीतील सर्व १२ गावांना लागू होणार आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाची कार्तिकी यात्रा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित प्रशासनाने दिलेल्या अटी आणि शर्तीवरच आयोजित करण्यात येणार आहे.
आळंदीच्या कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर येथून तीन दिंड्यांना प्रत्येकी वीस वारकऱ्यांच्या उपस्थितीत आळंदी शहरात प्रवेश दिला जाणार आहे. आळंदी आणि आसपासच्या गावातील धर्मशाळेत वारकर्यांना आणि भाविक भक्तांना राहण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. इंद्रायणी नदीत संचारबंदी कालावधीत स्नानाला बंदी आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यातय येणार नाही. मंदिरात प्रवेश करताना पास असणे बंधनकारक आहे. मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना मर्यादीत मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे स्पर्श दर्शन कोणालाही करता येणार नाही. मंदिरात प्रवेश करताना मास्कचा वापर, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.
कार्तिकी यात्रेच्या दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने आयोजित करणारे सर्व कार्यक्रम सोशल मीडिया, युट्युब, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना घरबसल्या ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे.