केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा; अन्यथा खेड तालुका राष्ट्रवादीकडून तीव्र आंदोलनाचा इशारा
महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी विरोधी चुकीच्या कांदा निर्यातबंदी निर्णयामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. अलीकडे केंद्रात, राज्यात, संपूर्ण देशात कोरोना महामारीच्या संकटामुळे अगोदरच शेतकरी वर्ग फार मोठ्या अडचणीत असून; केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी निर्णयामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होणार असल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तक्रारी केल्या आहेत. सदरच्या निर्णयाचा शेतकरी वर्ग व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
सदरचा निर्णय हा शेतकरी व जनहित विरोधी असल्याने कांदा निर्यातिचा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा; अन्यथा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अंगीकृत संस्थांकडून व तमाम शेतकरी बांधवांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष कैलास सांडभोर, जिल्हा परिषद मा. सभापती अरुण चांभारे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुखदेव पानसरे, राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष अॅड. अरुण मुळूक, बाळासाहेब सांडभोर, शहराध्यक्ष सुभाष होले, अॅड. बाळासाहेब लिंभोरे, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. अतुल गोरडे, अॅड, सुनील वाळुंज, अॅड, बिभीषण पडवळ, अॅड. पवन कड यांनी इशारा असलेले निवेदनपत्र खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांना दिले आहे.