कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती दक्षता घ्यावी : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
महाबुलेटीन न्यूज
इंदापूर ( प्रतिनिधी ) :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आवश्यक दक्षता घ्यावी. आरोग्य खात्यामार्फत स्वच्छते विषयक जनजागृती करण्यात यावी. काम करणाऱ्या अधिका-यांना प्रोत्साहन दिले जावे, अश्या सूचना देत, कोरोना निर्मुलनाच्या कार्यवाहीस गती देण्यासाठी तालुक्याकरिता
उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-याची तालुक्यात नियुक्ती करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी ( दि.२९ ऑगस्ट ) च्या कोरोना आढावा बैठकीत दिल्या.
येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक झाली. तहसिलदार सोनाली मेटकरी, नगराध्यक्षा अंकिता शहा, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुहास शेळके,डॉ.सुरेखा पोळ, डॉ. मिलिंद खाडे,इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल,इंदापूरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर,भिगवण,वालचंदनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले की, लोकांनी मास्क वापरावेत. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे. घरातील वयोवृद्धांची काळजी घ्यावी. सॅनिटायझरने वारंवार हात धुवावेत. ते नसेल तर साबणाने हात स्वच्छ धुवावेत. कोरोनाला घाबरुन जावू नये. काळजी घ्यावी, मात्र काळजी करु नये.
आरोग्य खात्यामार्फत स्वच्छतेविषयक जनजागृती करण्यात यावी. रात्रंदिवस कार्यरत असणा-या प्रशासनाकडून काम करत असताना काही उणीवा राहत असतील,त्या दुरुस्त करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. काम करणाऱ्या अधिकारी वर्गाला प्रोत्साहन दिले जावे, असे ते म्हणाले.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोरोना निर्मुलनाच्या कामास गती देण्यासाठी तालुक्यात उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-याची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच त्याचे काम सुरु होईल, अशी माहिती राज्यमंत्र्यांनी दिली.
तालुक्यातील अधिकारी वर्गाला त्यांची याकामी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ.मिलिंद खाडे यांनी केलेल्या मागणीनुसार राज्यमंत्री भरणे यांनी तात्काळ पन्नास लसी मिळतील याची व्यवस्था केली. अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटरच्या उपलब्धतेची माहिती घेतली.
●● तालुक्यात आजपर्यंत एकूण ६७० कोरोबाधित आढळून आले आहेत. ग्रामीण भागातील ४६९ व शहरातील २०१ रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. ग्रामीण भागातील १९ रुग्ण व शहरातील १० अश्या २९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या २५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी ९६ जणांचे अहवाल येणे बाकी आहेत,असा आढावा अधिका-यांनी दिला.●●