करियरच्या वाटा निवडताना…!
१० वी आणि १२ वीचं वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी निर्णायक जरी असलं तरी पालकवर्गाच्या चिंतेत भर पडते ती निकालानंतर. कारण शैक्षणिक आयुष्याच्या याच वळणांवर विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरत असते आणि मग सुरु होतो पाल्यासाठी योग्य करियर निवडण्याचा शोध. हा शोध घेत असताना पालकांकडून नेहमी एक चूक प्रामुख्याने होते ती म्हणजे आपल्या पाल्याच्या मताचा आणि आवडीचा विचार न करणं.
पारंपरिक “पदवी किंवा पदविका” घेऊन मुलांना नोकरीसाठी सज्ज केलं म्हणजे आपली जबाबदारी संपली, असा समज रूढ आहे. परंतु सध्याच्या स्पर्धात्मक आणि वेगवान दुनियेत हा समज कालबाह्य ठरतो. प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या अल्प संधी, वाढलेलं डिजिटलायझेशन आणि तुलनेने रोजगाराच्या शोधात असलेल्यांची संख्या अधिक हे चित्र सर्रास पाहायला मिळतं. अशी परिस्थिती राहिली तर अर्थशास्त्राच्या “मागणी-पुरवठा” नियमाप्रमाणे त्या त्या क्षेत्रांची काय अवस्था होईल, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज लागणार नाही. उदा. डीएड,इंजिनीरिंग.
असो, या साऱ्या कल्लोळामध्ये मग शाश्वत पर्यायाचा शोध पाल्यांकडून सुरु होतो. सरकारी नोकरी असेल तर डोक्याला टेन्शन नाही आणि वरून “सरकारी नोकरीचा रुतबा” हा या मुलांना खुणावतो. “नागरी सेवा” ही भारतातील एक प्रतिष्ठित आणि अधिकारयुक्त सेवा मानली जाते. समाजसेवा आणि नागरीसेवा या दोन्ही जरी समाजासाठी असल्या तरी यात एक महत्वाचा मूलभूत फरक आहे. समाजसेवा ही आवडीने केली जाते तर नागरीसेवा हि अधिकाराने केली जाते. संपूर्ण गावाच्या समाजसेवेच्या भावनेतून गावाचा जो कायपालाट होत नाही तो एखादा सनदी अधिकारी आपल्या मिळालेल्या अधिकारातून आणि उपलब्ध साधनांतून घडवू शकतो.
मग प्रश्न उभा राहतो की, या नागरी सेवेत एक अधिकारी म्हणून काम करायचे असेल तर करियरची कुठली वाट १० वी किंवा १२ वी नंतर निवडावी? सरकारी नोकरीचा मार्ग घ्यायचाच असेल तर एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, एसएससी,सरळसेवा भरती या सारख्या वाटा आजमाव्या लागतात. यातल्या यूपीएससी मधून आपण नागरी सेवेतील जिल्हास्तरावरील अधिकारी बनू शकतो. यूपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग. या आयोगामार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा देण्यासाठी पदवीधर असणे क्रमप्राप्त आहे. जर नागरी सेवेचा मार्ग ठरलाच असेल तर अगदी कला शाखेतून पदवी घेणे सर्वात फायद्याचे ठरते. कारण या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कला विभागातील अनेक विषय समाविष्ट आहेत. उदा. इतिहास,भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, भारतीय कला आणि संस्कृती, आपत्ती व्यवस्थापन.
करियर हे निवडण्याची नाही, तर घडवण्याची बाब आहे. पदवीच्या कालावधीत अनेक मार्गांनी एका कुशल प्रशासकासाठी लागणारे गुण आत्मसात करावे लागतात.
या लेखमालिकेतून आपण केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आणि त्यासाठी लागणारी तयारी याचे विस्तृत विश्लेषण पाहणार आहोत. जर आपण एक इच्छूक म्हणून किंवा एक पालक म्हणून या सदाराशी जोडलात तर आपल्याला किंवा आपल्या पाल्याला या लेखमालिकेचा निश्चित फायदा होईल.
–प्रा. मयूर दिलीप जायभाय ( संचालक, BlitzIAS Academy. लेखक व्यवस्थापन महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक व महाराष्ट्र स्वयंरोजगार विकास केंद्रात मार्गदर्शक म्हणून काम करतात)