आळंदीत भाविक, नागरिकांचे आरोग्य सुरक्षिततेस प्राधान्य, ● आळंदीत मोठा पोलीस बंदोबस्त..
आळंदीत भाविक, नागरिकांचे आरोग्य सुरक्षिततेस प्राधान्य,
● आळंदीत मोठा पोलीस बंदोबस्त..
महाबुलेटीन न्यूज
आळंदी (अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी यात्रा पालखी सोहळ्यास आळंदीसह पंचक्रोशीतुन आळंदीस जोडणा-या रस्त्यांवर तिहेरी बंदोबस्त तैनात करण्यात येत असून भाविक, नागरिकांनी आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने कोरोना महामारीचे संकट काळात अनावश्यक बाहेर फिरू नये, तसेच अत्यावश्यक गरजेच्या वेळी स्वत: बरोबर स्थानिक ओळखपत्र जवळ बाळगण्याचे आवाहन आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.
आळंदी माऊली पालखी सोहाळ्यांतर्गत श्रींचे चल पादुकांचे प्रतिकात्मक प्रस्थान ठराविक मोजक्याच वारकरी भाविकांचे उपस्थितीत येत्या २ जुलैला आळंदी मंदिरातून सायंकाळी सहाच्या सुमारास हरिनाम गजरात होणार आहे. यावर्षीही सोहळ्यावर कोरोना महामारीचे सावट असल्याने सोमवार (दि.२८) पासून ४ जुलै पर्यंत आळंदीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वारकरी भाविकांची प्रस्थानला गर्दी होवू नये, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सोहळ्याचे काळात आळंदीत नागरिक, भाविक, वारकरी यांचे आरोग्य सुरक्षिततेस प्राधान्य देत प्रभावी बंदोबस्त लावण्यात येत आहे. यासाठी पोलिसांची मोठी फौज सुरक्षिततेस उभी राहणार आहे. यामध्ये लावणेत येणा-या बंदोबस्तात ५० पोलीस अधिकारी, २१० पोलीस अंमलदार, ९० होमगार्ड, २ एस आर पी एफ च्या ( SRPF ) तुकड्या, बॉम्ब शोधक व नाशक पथक, घातपात विरोधी पथक तैनात करण्यात येत आहे.
बंदोबस्त आखणी मध्ये मंदिर व परिसरास प्राधान्य देण्यात आले असून मंदिरात व मंदिराबाहेर अशा तीन टप्यात नाकाबंदी व बेरिकेटिंग केली जाणार आहे. यात एक मंदिराचे लगत, दोन प्रदक्षिणा रोड, तीन आळंदी शहरा बाहेरील ठिकाणी असा तिहेरी बंदोबस्त लावण्यात येत आहे.
आळंदी शहरातील कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी आपले आधारकार्ड अगर एखादे ओळख पटवून देणारे कागदपत्रे जवळ बाळगावे, म्हणजे अत्यावश्यक कामास बाहेर जाता येईल; मात्र अनावश्यक विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन आळंदी पोलिसांनी केले आहे. आळंदीत बंदोबस्ताची तयारी सुरू करण्यात आली असून पोलिसांची मोठी कुमक आळंदीत आली आहे. आळंदी पोलिस स्टेशन, आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान मध्ये प्रस्थानाची तयारी सुरू करण्यात आली असून यावर्षी कोरोना महामारीमुळे भाविक, वारकरी व स्थानिक नागरिकांचे आरोग्य सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आले आहे.
००००