नियोजनाअभावी राज्यापेक्षा इंदापूरचा कोरोनाबाधितांचा मृत्यूदर जास्त : हर्षवर्धन पाटील
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : नियोजनाअभावी राज्यापेक्षा इंदापूरचा कोरोनाबाधितांचा मृत्यूदर जास्त आहे, असा दावा करत, कोरोनाचा संसर्ग व मृत्यूदर रोखण्यासाठी इंदापूर तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. त्यामुळे कोरोनाचे निदान लवकर करणे शक्य होईल. बाधितांकडून होणारा संसर्ग रोखला जाईल. सर्वेक्षणात आढळून आलेल्या बाधितांवर तातडीने उपचार होऊन त्यांचा जीव वाचेल, असे ही पाटील म्हणाले.
ते म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ हजार १५० पर्यंत पोहचली आहे. ४६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केवळ ऑक्सीजन, व्हेंटीलेटरची सुविधा मिळाली नाही, या कारणामुळे यातील सुमारे ३० ते ३२ रुग्णांचा मृत्यू झाला असा दावा करत, राज्यातील कोरोनाबाधितांचा मृत्युदर हा अडीच ते तीन टक्क्यांच्या आत असताना इंदापूर तालुक्यात तो ४ टक्के एवढा जास्त का असा सवाल त्यांनी केला.
येथील लोकप्रतिनिधी असलेल्या मंत्र्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये अपयश आले आहे. त्यामुळेच तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यू दर हा जास्त आहे, असा आरोप पाटील यांनी केला. इंदापूर तालुका हा कोरोनाचा हॉट स्पॉट होईल, असा इशारा आपण चार महिन्यांपूर्वी जाहिररित्या दिला होता. त्या नुसार शासनाने ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आदि सुविधा द्याव्यात, अशी मागणी ही केली होती. तसे नियोजन झाले असते तर आज मृत्यूची संख्या वाढली नसती, असे पाटील म्हणाले.
विद्यमान लोकप्रतिनिधींना परिस्थितीचे गांभीर्य नाही. जबाबदारीची जाणीव नाही. उपचाराचे तातडीचे व योग्य व्यवस्थापन करण्यात ते निष्क्रिय ठरत आहेत, अशी टीका करुन, इंदापूर तालुक्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह वैद्यकीय साधनांची, डॉक्टर व स्टाफची कमतरता, रुग्णाच्या मृत्यूनंतर नातलगांना होणारा त्रास याकडे कोणाचेच लक्ष नाही. कोरोना केंद्रात अद्यापि अनेक असुविधा आहेत. बैठकांमध्ये घोषणा करण्या ऐवजी कोरोना रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, असा सल्ला पाटील यांनी दिला.
लोकांचा शासन, प्रशासनावर विश्वास राहिला नाही. फक्त आश्वासने दिली जातात. स्वतःलाच स्वतःचे व कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करावे लागणार आहे, अशी लोकांची मानसिकता झाली आहे. या परिस्थितीत सध्याच्या असुविधांचा मुद्दा त्यांनी कोठे मांडायचा, अशी विचारणा पाटील यांनी केली. आपण विरोधासाठी बोलत नाही, वस्तुस्थिती मांडत आहोत, असे ही ते म्हणाले.
कमी वेळेत कोरोना बाधितापर्यंत पोहोचून त्यांचे विलगीकरण करण्याकडे प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे. लोकांनी ही शक्यतो गर्दी टाळावी. सामाजिक अंतराचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
—