श्री क्षेत्र भंडारा डोंगराला बोगदा पाडून रिंगरोड होणार नाही, मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय
श्री क्षेत्र भंडारा डोंगराला बोगदा पाडून रिंगरोड होणार नाही, मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रस्तावित केलेला 110 मीटर रुंद रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून होणार नाही. डोंगराच्या बाजूने ‘रिंगरोड’ होईल. त्यानुसार सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती आमदार दिलीप मोहिते पाटील व आमदार सुनील शेळके यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंगरोडबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सोमवारी (दि. 13) बैठक झाली. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी वारकऱ्यांच्या भावनांचा विचार करून भंडारा डोंगराला बोगदा न पाडता या रिंगरोडचे रेखांकन बदलण्याची मागणी केली होती, त्यानुसार मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.
● “शिरुर लोकसभा मतदारसंघातील ७ गावातील शेतकऱ्यांच्या एकाच गटातून रिंग रोड व रेल्वे जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. जमिनीच्या लहान-लहान पट्ट्या शिल्लक राहात असून त्यात भविष्यात शेती करता येणार नाही, तसेच विकसितही करता येणार नाही. त्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिली होती. त्यामुळे अशा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांबाबत सकारात्मक विचार व्हावा अशी मागणी केली. त्याचबरोबर रिंग रोडवर स्थानिकांना जास्तीतजास्त अॅक्सेस मिळावेत, त्याचबरोबर दोन्ही बाजूला १२ मीटरचे सर्व्हिस रस्त्याची तरतूद करण्यात यावी. जेणेकरून रस्त्यालगतच्या जमीन मालकांना फायदा होईल, अशा स्वरूपाची भूमिका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या बैठकीत मांडली.
यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते, आमदार संग्राम थोपटे, आमदार भीमराव तापकीर, आमदार संजय जगताप, आमदार अशोक पवार, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे आणि एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित होते. तर, खासदार सुप्रिया सुळे आणि मावळचे आमदार सुनील शेळके ऑनलाइन सहभागी झाले होते.
● बैठकीत खासदार बारणे म्हणाले, “प्रस्तावित रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून जात असल्याचे नकाशामध्ये दाखवत आहे. डोंगराला बोगदा करण्यास वारकऱ्यांचा, संस्थानचा तीव्र विरोध आहे. वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेता भंडारा डोंगराला भेदून जाणाऱ्या रिंगरोडच्या
रेखांकनात बदल करावा. रिंगरोड डोंगराच्या बाजूने घेण्यात यावा. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्वत: मान्यता दिली. त्यानुसार सर्व्हे करण्याबाबत त्यांनी आदेश दिले. त्यामुळे रिंगरोड भंडारा डोंगराला भेदून
जाणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वारकऱ्यांनी चिंता करु नये.”
“त्याचबरोबर 110 मीटरच्या रिंगरोडमध्ये पीएमआरडीएने
मावळमध्ये 18 मीटरचा सर्व्हिस रोड टाकला आहे. 110
मीटरमध्ये थोडे क्षेत्र वाढवून रिंगरोडलगत 12 मीटरचा सर्व्हिस रोड ठेवण्यात यावा. त्याचे भूसंपादन एमएसआरडीसीने करावे. त्याचा मोबदला एमएसआरडीसीनेच द्यावा. रिंगरोडमध्ये शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देऊ नये. त्यांच्या तक्रारी समजून घ्याव्यात. त्या तक्रारींचे निराकरण
करावे”, अशी मागणीही खासदार बारणे यांनी बैठकीत
केली.
००००