सर्वसामान्यांचे मरणही झाले महाग, मरणानंतरचे सोहळे थांबवा, आता अनिष्ट प्रथा बदलण्याची गरज : हभप. भरतमहाराज थोरात
सर्वसामान्यांचे मरणही झाले महाग, मरणानंतरचे सोहळे थांबवा, आता अनिष्ट प्रथा बदलण्याची गरज : हभप. भरतमहाराज थोरात
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : “सर्वसामान्य व्यक्तीचे मरणही महाग झाले असून व्यक्ती मेल्यावर होणारा खर्च आता सर्वसामान्य माणसाच्या अवाक्याबाहेर जात असून दशक्रिया वा अन्य विधी करण्यासाठी आता सर्वसामान्य कर्जबाजारी होवू लागलेत यासाठी या अनिष्ट प्रथाबदलण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रवचन व कीर्तनकार ह.भ.प. भरतमहाराज थोरात यांनी चास ( ता. खेड ) येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले.
दिवसेंदिस रूढी, परंपरा यांना तिलांजली देवून नवनवीन ट्रेंड समाजात पसरताहेत, त्यामुळे या ट्रेंडचा सर्वसामान्य व्यक्तिंना कसा त्रास होतो याविषयी भाष्य करताना ह.भ.प. भरतमहाराज थोरात बोलत होते. त्यांनी सांगीतले की, “माणूस मेल्यावर त्याचा सोहळा करणे घातक ठरत असून त्याचा त्रास मात्र दुःखात असलेल्या परिवाराला होत आहे. मेलेल्या व्यक्तिंच्या घरातील लोक दुःखात असल्याने सभोवतालचे चार माणसे जे सांगतील किंवा जे म्हणतील ते ऐकण्याची दुःखित परिवाराची तयारी असते.”
“दशक्रिया विधी धार्मिक महत्त्व असणारा विधी अलीकडे धार्मिकते पेक्षा, दांभिकता वाढीस लागली आहे. दशक्रिया विधी निमीत्त त्यापरिवाराला होणारी आर्थिक मदत म्हणजे दुखवट्याचा प्रकार बंद करून पाकिट वाटपाची अनिष्ठ प्रथा सुरु झाली आहे. वेगवेगळ्या संस्थांना दिलेली आर्थिक मदत संबधितांपर्यंत न पोहचता त्याचा मधेच गैरवापर होतो. पंधरा, वीस हजार भांडून घेणारा सेलिब्रिटी धंदेवाईक महाराज प्रवचनाला बोलवायचा, तर पाच हजार रुपये घेऊन सुत्रसंचालन करणारा निवेदक, असे प्रकार वाढीस लागलेले आहे. ही देण्याची प्रथा आल्याने सर्वसामान्य माणूस कर्जबाजारी होतोय. ज्यांची ऐपत असेल त्यांनी हे जरूर करावे, त्याबद्दल काही आक्षेप नाही, परंतु लोकलज्जा व लोकआग्रहास्तव गोरगरिबांना सरसकट भरडले जाते, म्हणून कधी कधी वाटतं, आजकाल जगण्यापेक्षा मरण महाग झाले.” असे थोरात महाराज म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “याशिवाय दशक्रियेच्या जेवणाचाही इव्हेंट झालेला असून भाऊबंदांनी केलेला स्वयंपाक आता कालबाह्य झाला आहे. आचाऱ्याला माणसांनुसार ठरवून देवून वेगवेगळे पदार्थ कसे ताटात येतील हे पाहिले जात आहे. पण यामध्ये दुःखित परिवाराला हस्तक्षेपकरता येत नसल्याने त्यांना बघ्याची भूमीका घ्यावी लागते. यापुढे माणसांना माणसांसाठी वेळ द्यायला शिल्लक राहिलेला नसल्याने काँट्रॅक्ट पद्धत येवून विधीही तुम्हीच करा, रडण्यासाठी माणसेही तुम्हीच आणा, दहावा, तेरावा तुम्हीच घाला फक्त आम्हाला रक्कम सांगा किती द्यायची हे सुरू होणार असून त्याची सुरवात झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगीतले. यावर मात करायची असेल तर लोकांनी एकत्र या, समाज व्यवस्था ढासळणार नाही याची काळजी घ्या, ज्याला शक्य आहे त्यांनी जरूर दान करा मात्र ज्याला शक्य नाही त्याला कर्जाच्या खाईत लोटू नका,” असेही ते म्हणाले.
0000