इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची.. माऊलींचा ७२४ वा समाधी सोहळा संपन्न
महाबुलेटीन न्यूज : दिनेश कुऱ्हाडे
आळंदी देेवाची : संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२४ वा समाधी सोहळा यंदा भक्तिमय वातावरणात आणि संत नामदेव महाराजांचे वंशज हभप ज्ञानेश्वर महाराज नामदास यांच्या ह्रदयस्पर्शी समाधी सोहळ्याच्या किर्तनसेवेने वीणा मंडपात संपन्न झाला.
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिरात परंपरेप्रमाणे समाधीला पवमान अभिषेक प्रमुख विश्वस्त अभय टिळक यांच्या हस्ते करण्यात आला करण्यात आला. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला.
सकाळी ७ ते ९ हैबतबाबा पायरी पुढे आरफळकर, सकाळी ७ ते ९ व ९ ते ११ भोजलिंग काका मंडपात दानेवाले निकम दिंडी यांच्या किर्तन सेवा झाल्या. त्यानंतर सकाळी दहा ते बारा वेळेत संत नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे समाधी प्रसंगावर कीर्तन झाले.
यावेळी त्यांनी ब्रम्ह मुर्ती संत जगी अवतरले। उध्दराया आले दीनजना। या अभंगातून किर्तनरुपी निरुपण केले. ते म्हणाले की, या मृत्युलोकामध्ये येण्याचे प्रत्येकाचे कारण निराळे आहे. मानवाचा विचार केला तर ज्ञानोबाराय म्हणतात, माणुस हा आपले उर्वरित प्रारब्ध कर्म भोगण्यासाठीच जन्माला येतो.
अगा कर्मे जै उरावे।
तिही सुखदुःखी फळावे।
तयाते भोगावया यावे।
देहा एका।।
देवाचे येण्याचे कारण पाहिले तर भक्तांचे रक्षण व दुष्टांचा संहार करण्यासाठीच ते येतात.
भक्ता राखे पायापासी।
दुर्जनांसी संहारी।। तु.म.
परंतु संतांचे अवतार कार्य नामदेवराय सांगतात.
संतांचा अवतार हा निव्वळ दीनजनांच्या उध्दारास्तवच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, पाणी हे तृषीतांची तहान भागवण्यासाठीच निर्माण झाले आहे. त्या प्रमाणे दुःखीतांना त्यांच्या दुःखातुन मुक्त करण्यासाठीच संतांचा अवतार आहे. अशा संतांना नामदेवराय ब्रम्हमुर्ती असे संबोधतात. आपण करुणामुर्ती, सत्कारमुर्ती, कैवल्यमुर्ती असे अनेक शब्द ऐकले आहेत. परंतु ब्रम्हमुर्ती संज्ञा संतानाच शोभते. याला कारण त्यांची दृष्टी सम झालेली असते. या उपाधी मध्ये गुप्त असणारे ब्रम्ह त्यांना उघड दिसते.
ब्रम्ह दिसे उघडे। जगामाजी ब्रम्ह दिसे उघडे।। ब्रम्हाच्या या अलौकीक अनुभुतीने ते स्वतःच ब्रम्ह झाले होते. म्हणुनच नामदेवराय त्यांना ब्रम्ह मुर्ती म्हणतात.
तोची तो निरुता।
समदृष्टी तत्वता।
हरी म्हणे पंडुसुता।
तोची ब्रम्ह।।
म्हणुनच संत ब्रम्ह मुर्ती, आणी यांचा अवतार हा केवळ मुढजनांच्या उध्दारास्तवच असतो. समाधी सोहळ्याची किर्तन रुपी प्रसंग सांगताना नामदास महाराज यांच्या सहीत उपस्थितीत भाविकांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर संत नामदेव महाराजांच्या पादुका संत ज्ञानेश्वर महाराज समाधी जवळ आणण्यात आल्या आणि भाविकांनी संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी करून ‘पुंडलिका वरदे’चा गजर करीत माउलींचे स्मरण केले.
देवस्थान समितीकडून उपस्थित मानकरी, सेवेकरी, मान्यवरांना श्रीफळ प्रसाद देण्यात आले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त विकास ढगे पाटील, योगेश देसाई, पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, माऊलींचे मानकरी बाळासाहेब कुर्हाडे, स्वप्निल कुर्हाडे, राहुल चिताळकर, योगेश आरु, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, नगरसेवक सचिन गिलबिले, सागर भोसले, आदित्य घुंडरे, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगरसेवक डि. डि. भोसले, आळंदी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे उपस्थित होते.
—