प्रकल्पग्रस्त शेतकरी पालकमंत्र्यांच्या बैठकीच्या प्रतिक्षेत
भामा आसखेड मधून पुण्याला पाणी नेणाऱ्या जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर
महाबुलेटीन न्यूज : दत्ता घुले
शिंदे-वासुली ( दि २५ ) : १४ ऑगस्ट पासून प्रचंड पोलीस बंदोबस्तात सुरु झालेले आसखेड खुर्द हद्दीतील पुणे शहराच्या पुर्व भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या एक किलोमीटर जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर चालू आहे. कामाचा वेग पाहता पुढील २० ते २५ दिवसांत जलवाहिनेचे सर्व कामे पुर्ण होण्याची शक्यता आहे. जलवाहिनेचे खोदकाम करण्यासाठी व पाईप फिटींगसाठी ९-१० मशिन्सचा ताफा असून पाईपजोड देण्यासाठी कारागीर व मजुरांची संख्याही वाढवलेली आहे.
पुणे शहराच्या पुर्व भागाला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामाला भामाआसखेड प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे अनेकदा ब्रेक लागला होता. प्रत्येक वेळी शासनाने शेतकऱ्यांना पुनर्वसन संबंधित मा़गण्यांची पुर्तता करण्याचे व काही अंशी पुर्ण करण्याचे प्रयत्न केले. परंतु शासन आणि धरणग्रस्तांच्या संघर्षात पुणे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसानीचा फटका बसला.
शहराच्या पुर्व भागातील वाघोली, चंदननगर, घोरपडी आदी नागरीवस्त्यांना भामाआसखेडचे पिण्याचे पाणी देण्याबाबत च्या अनेक तारखा फेल झाल्या आहेत. जलवाहिनेचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे भामाआसखेडग्रस्तांना मदतनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने महानगरपालिकेने आर्थिक मोबदला वाटप करण्यात येत आहे. परंतु आर्थिक मोबदला याशिवाय धरणग्रस्तांचे पुनर्वसन बाबतीतले अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने सुरुवातीला महानगरपालिकेला भामाआसखेडच्या रोषाला सामोरे जावे लागते.
अशीच परिस्थिती जून २०२० ला झाली होती. जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात या जलवाहिनेचे काम सुरू केले होते. परंतु धरणग्रस्तांचा उद्रेक पाहता, जलसमाधी आंदोलनाची तिव्रता लक्षात घेऊन काम बंद ठेवले होते. परंतु जिल्हा प्रशासनाने पुन्हा पुणे महानगरपालिकेसाठी जलवाहिनेचे काम १४ ऑगस्ट पासून परत पोलीस बंदोबस्तात चालू केले आहे.
यावेळी ही धरणग्रस्तांनी पुन्हा आंदोलनाची हत्यार उपासल्याने जलवाहिन्याच्या कामावर टांगती तलवार कायम होती. परंतु खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील प्रकल्पग्रस्तांची समजूत काढण्यात यशस्वी झाले. आंदोलन मागे घेतले गेले. आणि कामावरील अरिष्ट टळले.
एक किलोमीटर अर्धवट राहिलेल्या जलवाहिनेचे काम कंत्राटदार पुर्ण ताकदीनिशी करत आहे. कामगार व मशिनरी वाढवून काम वेगाने चालू आहे. दोन महिन्यांपूर्वी काम बंद करतेवेळी किमान ९ पाईप टाकून झाले होते. म्हणजे १००० मीटर पैकी १८० मीटर जलवाहिनेचे काम झाले होते. तसेच १४ तारखेपासून आजपर्यंत किमान २३ -२५ पाईप जोडण्याचे काम झाले असून एकूण जलवाहिनेचे अंदाजे ६००-७०० मीटर काम झाल्याची शक्यता आहे. तसेच प्रत्यक्ष फिल्डवरती काम करणारे अभियंता व कामगारांनी कामाबाबतची माहिती दिली असून रोज किमान तीन पाईप जोडले जात आहेत. जलवाहिनेवर काम करणाऱ्यांच्या माहिती प्रमाणे या एक किलोमीटर जलवाहिनीचे काम २०-२५ दिवसांत पुर्ण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान जलवाहिन्याच्या कामाला प्रकल्पग्रस्तांचा अडथळा नसला तरी पावसात काम करणे मोठ्या कष्टाचे व जिकिरीचे काम आहे. प्रचंड पावसामुळे भामचंद्र डोंगराला पाझर सुटला असून पडणारे पावसाचे पाणी व पाझर यामुळे खोदकाम करणे, पाईप टाकणे, जोड देणे, वेल्डिंग करणे सहज शक्य होत नाही. जलवाहिनीसाठी खोदलेल्या ठिकाणी इतके पाणी साठलेले असते की चार पाच मोटर्सनी पाणी उपसले जाते तरी पाणी हटत नाही. पावसात वेल्डींग होत नाही. त्यामुळे कामाचा वेग काहीसा मंदावला आहे. परंतु थोड्याच दिवसांत जलवाहिनेचे काम पूर्ण करण्याचा संबंधित ठेकेदाराचा मानस दिसतो आहे.
कदाचित जलवाहिनेचे काम पूर्ण होण्याच्या बेतात असेल परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना १५ लाख रुपये आर्थिक पॅकेज बाबतीत व पुनर्वसनाच्या अन्य प्रश्नांबात दोन तीन दिवसात विभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून आठ दिवसांत पालकमंत्री अजित पवारांसोबत धरणग्रस्तांची बैठक लावून मार्ग काढण्याचे आश्र्वासन दिले होते. ते पुर्ण होईल का. अजूनही आमदारसाहेब वा जिल्हा प्रशासनाकडून कोणताच सांगावा आला नाही. शासनाच्या मनात नेमकं चाललंय तरी काय ? अशा आशयाची उलटसुलट चर्चा सध्या भामाआसखेड प्रकल्पग्रस्त सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत.
नक्कीच पुढील काळच ठरवील आंदोलनाचं फलित काय ? शेतकऱ्यांना काय मिळालं किंवा काय मिळणार ? जलवाहिनी पुर्ण होईल का ? आणि पुर्ण झाली तरी पुढे काही आणखी बाधा येतील का ? त्यातूनही लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, जिल्हा प्रशासन काही योग्य नियोजन करून पुण्याची तहान भागवेल का ? याची उत्तरे पुढील काळच देईल.
——-