ऑक्सीजन बेड आणि वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे उपसंपादक श्रीकृष्ण पादीर सरांच्या पत्नीचे दुर्दैवी निधन
ऑक्सीजन बेड आणि वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे उपसंपादक श्रीकृष्ण पादीर सरांच्या पत्नीचे दुर्दैवी निधन
महाबुलेटीन न्यूज
पिंपरी चिंचवड : दैनिक प्रभातचे उपसंपादक आणि पत्रकारांचे मार्गदर्शक श्रीकृष्ण पादीर सर यांच्या पत्नी भारती ( वय ३६ ) यांचे आज शुक्रवारी ( दि. १६ एप्रिल ) सायंकाळी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड येथे कोरोनामुळे निधन झाले.
याबाबत जेष्ठ पत्रकार संतोष वळसे पाटील यांनी सांगितले की, शुक्रवारी पहाटे सव्वा दोन वाजता मला पादीर सर यांचा फोन आला. मी तुमची झोप मोड करत आहे. पत्नी भारतीला कोरोना झाला असून एच आर सिटी स्कोर २४ आहे. त्यामुळे तिला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असून ऑक्सिजन बेड आवश्यक असल्याचे सांगितले. मी त्यांना इंद्रायणीनगर येथील डॉक्टर शेटे यांचा नंबर देऊन माजी आमदार विलास लांडे यांचा संदर्भ देण्यासाठी सांगितले. परंतु तेथेही ऑक्सीजन बेडची व्यवस्था न झाल्याने त्यांनी माजी आमदार विलास लांडे यांना पहाटे फोन करून ऑक्सिजन बेडची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार माजी आमदार विलासराव लांडे यांनी खूप खूप प्रयत्न केले, परंतु ऑक्सिजन बेड अवेलेबल झाला नाही. परंतु त्यांच्या प्रयत्नामुळे सकाळी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये भारती ताई यांचे ऍडमिशन करण्यात आले.
मी पादीर सरांना सकाळी फोन करून भारतीताईंची तब्येतीची चौकशी केली असता तब्येत जास्तच बिघडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ऑक्सिजन बेडची नितांत आवश्यकता आहे. यासाठी गृहमंत्री वळसे पाटील साहेबांना फोन करा असे त्यांनी सांगितले, त्यानुसार मी वळसे पाटील साहेबांचे पीए डॉक्टर नवनाथ जरे यांना फोन करून वैद्यकीय मदतीची विनंती केली. तसेच माजी आमदार विलासराव लांडे यांच्याशी पुन्हा बोलून यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये आय सी आय सी यू मध्ये भारतीताईंना दाखल करून घेण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी हॉस्पिटलचे डीन यांच्याशी संपर्क करून मला कॉन्फरन्स वर घेतले. त्यावेळी मीही विनंती करून तातडीने भारतीताईंना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्याचे सांगितले. एका रुग्णाचे निधन झाले आहे, तो बेड खाली झाला; तर तातडीने देण्याची व्यवस्था करतो, असे हॉस्पिटलचे डीन यांनी मला सांगितले. सकाळी आठ वाजता संबंधित रुग्णाचे निधन होऊन दुपारी दोन वाजेपर्यंत बेड खाली झाला नव्हता. त्यावेळेपर्यंत भारतीताई यांची तब्येत खालावत चालली होती. ऑक्सिजन लेवल ६० वर आली होती. त्यामुळे त्यांना वैद्यकीय सेवेची नितांत गरज होती. आय सी यू रूम मधील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संबंधित इसमाची डेड बॉडी ताब्यात घेऊन बाहेर काढली. त्यानंतर सॅनिटायझर रूम शुद्धीकरणाच्या प्रक्रिया पार पडल्या. त्यामध्ये पुन्हा दीड तास गेला. त्यानंतर भारतीताईंना आय सी यु कक्ष मिळाला. तोपर्यंत त्यांची शारीरिक हालचाल मंदावली. ऑक्सिजन लेवल डाऊन झाली आणि त्यांचे त्यामध्ये दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मला उपसंपादिका मिलन मॅडम यांनी सायंकाळी सांगताच मलाही धक्का बसला.
भारतीताई यांना ८ वर्षाची आणि ६ वर्षाची अशा दोन लहान मुली आहेत. भारतीताई यांच्या जाण्याने पादीर सरांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद परमेश्वराने द्यावी, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि भारतीताई यांना तमाम पत्रकार बांधवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. तसेच माजी आमदार सन्माननीय विलासराव लांडे यांनीही भारतीताई यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. परमेश्वराच्या सत्तेपुढे कोणाचा इलाज नाही.
— दुःख:कित संतोष वळसे-पाटील आणि सर्व पत्रकार बांधव.