निमंत्रीत वारकरी आळंदीत दाखल ; कोविड १९ चाचणीला गर्दी
महाबुलेटीन न्यूज आळंदी (अर्जुन मेदनकर) : ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखीचे आळंदी मंदिरातून शुक्रवारी (दि.२) मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत प्रस्थान होणार आहे. यानिमित्त आळंदीत राज्य परिसरातून नेहमी प्रमाणे लाखो भाविक न येता मोजकेच व निमंत्रित हरिनाम गजरात दाखल झाली आहेत.
दरम्यान आळंदी देवस्थान व आळंदी ग्रामीण रुग्णालय यांचे माध्यमातून आलेल्या निमंत्रित वारकरी, मानकरी, टाळकरी, गावकरी यांची कोविड १९ ची तपासणी करण्यात आली आहे. यास मात्र संबंधितांनी गर्दी करीत आपली चाचणी करून घेतली.
आळंदीत मोठा पोलीस बंदोबस्त
आळंदी पालखी सोहळ्यावर कोविड १९ चे सावट असून मागील वर्षी प्रमाणे मोजक्याच वारकरी भाविकांत संत ज्ञानेश्वर महाराज पादुका पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. यासाठी आळंदी देवस्थान , आळंदी पोलिस, खेड महसूल, विद्युत विभाग, आळंदी नगरपरिषद, आळंदी ग्रामीण रुग्णालय आरोग्य सेवा प्रशासन कोविड १९ चे मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत तयारी करीत आहे. यावर्षी कोरोंना महामारीचे सावट असल्याने लाखो भाविकांविना (मोजक्याच भाविकांत) पालखी सोहळ्याचे प्रतिकात्मक चल पादुकांचे प्रस्थान होणार आहे.यामुळे नेहमी प्रमाणे रस्त्यावर गर्दी नाही. मात्र प्रभावी पोलिस बंदोबस्त तैनात केल्याने माऊली मंदिर परीसराला छावणीचे स्वरूप आलेले आहे. बंदोबस्तास मोठ पोलिस बंदोबस्त फौज फाटा प्रवेशला असून आळंदीत तिहेरी बंदोबस्त लावण्यात आला आहे.
यावर्षी भाविक फारसे आळंदीत न आल्याने नाम गजराचा आवाज कमी झाला असून काही ठिकाणी प्रथा परंपरांचे पालन करीत नाम गजर आळंदी मंदिरासह सुरू आहे. श्रींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवारी (दि.२ ) झाल्याने नंतर पहिल्या मुक्कामास सोहळा जुन्या गांधी वाड्याचे जागेत देवस्थानाने विकसित केलेल्या आजोळघरी समाज आरतीने विसावेल. येथे रात्री जागर आणि मुक्काम पाहुणचार होणार आहे. सोहळा यावर्षीही आळंदीतच १८ जुलै पर्यन्त राहणार असून १९ जुलै ला दोन बस मधून हरिनाम गजरात पंढरपूर कडे मोजक्याच भाविकांतून मार्गस्थ होणार आहे.
माऊलींचे पालखी सोहळ्याची जय्यत तयारी आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान,पुणे जिल्हा महसूल, पोलीस, आरोग्यसेवा, वीज महावितरण विभागणी केली आहे. श्रींचे प्रस्थान काळात भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशावर कामकाज होताना दिसत आहे. माउली मंदिराचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक माउली वीर,श्रीधर सरनाईक यांनी प्रशासनाचे सूचना प्रमाणे कामकाज करीत मंदिरात प्रस्थान सोहळ्याची तयारी केली आहे.
आळंदी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया यांचे मार्गदर्शक सूचना प्रमाणे आळंदीत येणाऱ्या भाविकांना नागरी सेवा सुविधा देण्यात येत आहेत. यासाठी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी प्रशासनास हाती धरून तयारी पूर्ण केली आहे. यात्रा काळात नागरी सुविधां मुळे गैरसोय होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतल्याचे सांगितले.
वारकरी संप्रदायाची भागवत धर्म भगवी पताका उंचावत ज्ञानोबा-माउली-तुकोबाचे नामगजरात अलंकापुरीत मानकरी, वारकरी दाखल होत असून आळंदीत वातावरण भक्तिमय असले तरी भाविकांविना तसेच संचारबंदीने काहीशी नाराजी आहे. येथील पवित्र इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. मात्र इंद्रायणी नदी घाटावर संचारबंदीने जाण्यास मनाई असल्याने इंद्रायणी नदी घाट सूनासुना दिसत आहे. आळंदी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात केला असून भाविक, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनाने दक्षता घेतली आहे. इंद्रायणी नदीचे दुतर्फा भाविकांची गर्दी होणार नसल्याने नदी घाटावर वेगळे वैभव पाहण्यास सर्व जन वंचित राहणार आहेत. आळंदी मंदिरात आकर्षक लक्षवेधी विद्युत रोषणाई तसेच पुष्प सजावटीचे नियोजन करण्यात आले असून याची लगबग सुरू आहे. आळंदीत इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.
आळंदीतील मंदिर परिसरातील रस्ते मोकळे असून सर्वत्र शुकशूकाट दिसत आहे. मठ, मंदिरे, धर्मशाळा, नदी किनारा, गोपाळपूर, शाळेची मैदाने आदी ठिकाणी भाविकांची वर्दळ नसल्याने ओस दिसत आहेत. मोकळ्या जागेत भाविकांच्या राहुट्या, तंबू यावर्षी मात्र दिसत नाहीत
पोलीस बंदोबस्त आळंदीत तैनात झाल्याने तीर्थक्षेत्र आळंदीला छावणीचे स्वरूप आहे. शहरात, मंदिर परिसर, प्रदक्षणा मार्ग, गोपाळपूर, इंद्रायणी नदी घाटाचे दुतर्फा, चौकातील टेहळणी मनोरे आदी ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आळंदीत दर्शनबारी, आजोळघर येते देखील पोलिसांचा खडा पहारा आहे. भाविकांचे सुरक्षिततेसाठी दक्षता घेत पोलीस प्रशासनाने सूचनां प्रमाणे अधिकची काळजी घेत बंदोबस्त तैनात केला आहे. सतर्क राहण्यास नागरिक व भाविकांना सूचना देण्याचे काम पी.ए.सी. यंत्रणेद्वारे केले जात आहे. पोलिसांनी गस्त वाढविली आहे. आळंदीत वाहन प्रवेशावर मर्यादा आली आहे. पास शिवाय आळंदीत वाहनांना प्रवेश दिले जात नाहीत.
००००