मुख्यमंत्र्यांनंतर आता शरद पवार तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकीचे फोन
महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई ( दि. ७ सप्टेंबर ) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचे फोन आले आहेत. तर अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणी भाष्य केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी सरकारच्या तीन प्रमुख नेत्यांना धमकीचे फोन आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याचे काल समोर आले होते. आता, शरद पवार यांनाही काल भारताबाहेरुन धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. तर कंगना राणावत विषयी टिप्पणी केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले. हे फोन कोणाकडून आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक बोलत असल्याचा दावा करणारा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आला होता. त्यामुळे ‘मातोश्री’ निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.