Wednesday, June 25, 2025
जयंतीदिन विशेषराष्ट्रीयविशेष

महाबुलेटीन दिनविशेष : लाल बहादूर शास्त्री जन्मदिन

०२ ऑक्टोबर – लाल बहादूर शास्त्री जन्मदिन
********************************

जन्म – २ ऑक्टोबर १९०४
मृत्यू – ११ जानेवारी १९६६ (ताश्कंद)

भारताला ‘जय जवान, जय किसान’ हा मंत्र देणाऱ्या भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती.

त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण शास्त्री झाले. त्यांच्या जन्मा नंतर लवकरच त्याच्या वडिलांचे देहांत झाले. त्यामुळे त्यांच्या आईने माहेरी जावून त्यांचे संगोपन केले. त्यांचे बालपण आजोळी मामाच्या आश्रयात झाले. महात्मा गांधीजींच्या विचारांचा जबरदस्त पगडा शास्त्रीजींच्या मनावर होता.

शास्त्री जेवढे मृदू होते तेवढे निश्चयी होते. महात्मा गांधींचे पहिले दर्शन त्यांना १९१६ साली झाले. त्यावेळी ते आफ्रिकेत सत्याग्रह करून नुकतेच भारतात आले होते. तेव्हा पांढरा काठेवाडी फेटा, अंगरखा व जोडा सर्वांच्या नजरेत भरेल असा त्यांचा पेहराव होता. साधा पेहरावां खाली दडलेल्या विचारांची श्रीमंती त्यांच्या भाषणा वरून दिसून आली. राजे महाराजाच्या समोर केलेल्या भाषणात गांधी म्हणाले होते, “भारतातील जनता दारिद्र्यात मरत असताना एवढे अलंकार चढवून राजे महाराजे येथे आलेत. त्यांनी अगोदर आपले जडजवाहीर विकून टाकावे व मिळालेला पैसा गोरगरिबांना वाटावा.” महाराजांच्या श्रीमंतीची घाणाघात करणारे शब्द ऐकून अनेक राजे भर सभेतून उठून गेले. पण सभा ऐकण्यासाठी आलेली जनता गांधीजींच्या या भाषणाने टाळ्या वाजवून यथोचित सन्मान केला. हे दृश्य शास्त्रीजींनी पाहिले व ते देश प्रेमाने प्रेरित झाले.

त्यांचे मन अभ्यासात लागे ना तेव्हा त्यांनी शाळेला राम राम ठोकला व ते स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाले. पण त्या नंतर ते पुन्हा शिक्षणाकडे वळले. त्यांना ज्ञान संपादनाची विशेष हौस होती कॉलेजला जाण्यासाठी त्यांना रोज ५ ते १० मैलाची पायपीट करावी लागायची. कॉलेज झाल्या नंतर त्यांचा एक निश्चय होता कि नोकरी न करता समाजसेवा करायची. त्या वेळी लाला लजपतराय यांनी गोखल्यांच्या धर्तीवर ‘लोकसेवक समाज’ संस्था काढली व त्याद्वारे शास्त्रीजींनी अस्पृश्योध्दाराचे काम सुरु केले. स्त्रियांची स्वतंत्रता आणि स्वदेशी हि त्यांची व्रते होती.

१९२७ साली ललितादेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आपला पती लोकसेवक आहे. त्याकरिता शास्त्रीजीचा वेळ संसाराच्या व्यापात जावू नये यासाठी त्या दक्षता घेत. ते देशासाठी ठिक ठिकाणी जावून आले तिथे तिथे आपल्या मृदू व निश्चयी शब्दांनी ती आपली छाप पाडीत. आणि आपल्या देशात काय उणे आहे, दुसऱ्या देशापासून काय घेण्या सारखे हे त्या प्रमाणे स्वदेशी परतल्या नंतर ते कामाला लागत.

२७ मे १९६४ ला नेहरूजींचे निधन झाल्या नंतर देशाची सर्वस्वी जबाबदारी लाल बहाद्दूर शास्त्री यांचेवर आली. त्यांनी आपल्या कृतीने माणसाचे शील व निश्चय किती प्रभावशाली असू शकतात हे त्यांनी स्वत:वरून दाखविले. अठरा महिन्याच्या छोट्याशा कारकिर्दीत आपण पंतप्रधान पदाला किती लायक होतो हे शास्त्रींनी आपल्या कृतीने दाखवून दिले.

शास्त्रीजींचे संपूर्ण जीवन हीच एक आदर्श आचार संहिता होय. त्यांच्या अंगच्या अनेक गुणांचा प्रत्यय आज पर्यंत अनेक वेळा आला असला तरी या वामन मूर्तीने अनेक धैर्यशाली मार्गदर्शन भारताला केले. त्याने सारे जग स्तिमित झाले आहे. भारताची मान जगात उंचावली. ”जय जवान, जय किसान” या शास्त्रीजींच्या नव्या घोषणेत त्यांच्या देश विषयक खंबीर धोरणाचे पडसाद उमटले.

लाल बहाद्दूर शास्त्री यांचे ११ जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे निधन झाले.

लाल बहाद्दूर शास्त्री यांना आदरांजली !

********************************

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!