आंबेगावपुणे जिल्हाविशेष

मध्यरात्री १ वाजता झाली किसान सभेची पदयात्रा स्थगित

 

महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
घोडेगाव : रोजगार हमी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दि.७ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झालेली किसान सभेची आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील चालत येत असलेली पदयात्रा दि. ८ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यरात्री १ वाजता मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाल्यामुळे स्थगित करण्यात आली असल्याचे किसान सभा पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड. नाथा शिंगाडे यांनी सांगितले.

जुन्नर, भीमाशंकर व शिरूर येथून सुमारे ३५ ते ४० किलोमीटर चालत लोक रात्री मुक्कामाला पोहचले होते. लोक चालत असतानाच पुणे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयात सायंकाळी ५ वाजता संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. यावेळी संघटनेचे प्रातिनिधिक शिष्टमंडळ पुणे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यास गेले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. विजयसिंह देशमुख, उपजिल्हाधिकारी श्री. सुधीर जोशी, नरेगा गटविकास अधिकारी श्रीमती देव मॅडम यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा शिष्टमंडळाची बैठक पुणे जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्यासोबत पार पडली. यावेळी रोजगार हमीच्या अंमलबजावणी मधील विविध अडचणी मा. जिल्ह्याधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर नमूद करण्यात आल्या.

बैठकीत झालेले काही प्रमुख निर्णय :-
————–
१) आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील ग्रामपंचायत चे व तसेच भोर, वेल्हा, शिरूर, मुळशी,खेड तालुक्यातील ही डोंगराळ भागातील ग्रामपंचायतचे लेबर बजेट वाढवून दिले जाईल..
२) आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील ग्रामपंचायत येथे मजूरप्रधान कामांचा शेल्फ तयार केला जाईल.
३) याबरोबरच आंबेगाव व जुन्नर येथील रोजगार हमी विषयक ज्या तक्रारी होत्या त्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी पंचायत समिती आंबेगाव व जुन्नर येथे येऊन जनसुनावणी घेतील व यावेळी तालुका निहाय ज्या तक्रारी असतील त्यांचे निराकरण केले जाईल..
४) वडगाव रासाई, शिरूर येथे मनरेगा कामावर जी ३० रुपये मिळाली होती ती वाढवून देण्याचा निर्णय झाला.
५) पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर येथे जेथे काम मागणी आली होती, तेथे तातडीने काम सूरु केले जाईल.
६) रोजगार हमी सेवकांचे तात्काळ मानधन अदा केले जाईल. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मध्यरात्री १ वाजता मागे घेण्यात आले.

 

या पदयात्रेचे नेतृत्व आंबेगाव मधून अशोक पेकारी, सुभाष भोकटे, जुन्नर मधून डॉ.मंगेश मांडवे, लक्ष्मण जोशी, शिरूर मधून दत्तात्रय बर्डे, संतोष कांबळे यांनी केले. यावेळी संघटनेचे शिष्टमंडळ ऍड. नाथा शिंगाडे, कामगार नेते अजित अभ्यंकर, शेतमजूर युनियन नेत्या किरणताई मोघे, डॉ. ज्ञानेश्वर मोटे, सीमाताई काकडे, राजू घोडे, डॉ.अमोल वाघमारे, विश्वनाथ निगळे, नंदाताई मोरमारे, माधुरीताई कोरडे, सुनील कोरडे, सोमनाथ धारवाड, श्री. शेलार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!