आरोग्यखेडपिंपरी चिचंवडपुणे जिल्हामीडियाराजकीयविशेष

कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण पिंपरी चिंचवडला एक थेंबही पाणी देणार नाही – आमदार दिलीप मोहिते पाटील

 

खेड तालुक्यातील पत्रकारांना जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या वतीने आरोग्य कीटचे वाटप

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरुनगर : कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण पिंपरी चिंचवडला एक थेंबही पाणी देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी घेतला आहे. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या वतीने पंचायत समितीच्या राजा शिव छत्रपती सभागृहात खेड तालुक्यातील पत्रकारांना आरोग्य कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील, जि. प. अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, जि. प. चे माजी पशुसंवर्धन खात्याचे सभापती अरुण चांभारे, खेड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास सांडभोर, अॅड. मनीषा टाकळकर, सुजाता पचपिंड व तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून आमदार दिलीप मोहिते यांनी आपली खंत व्यक्त केली. ते म्हणाले कि, महाराष्ट्रात सर्वात मोठी एम. आय. डी. सी. ही खेड तालुक्यात आहे. पण त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांसाठी कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा किंवा आरोग्य विषयक सुविधा याठिकाणी आढळत नाहीत. इथे फक्त प्रकल्प राबविले जातात. जमीनी
घेतल्या जातात आणि जमीनधारकांना वाऱ्यावर सोडले जाते.  नेते किंवा मंत्र्यांनी तालुक्याकडे ज्या दृष्टीने पाहिले पाहिजे त्यादृष्टीने ते पहात नाही. तालुक्यात मंत्री येऊन गेले की,
तालुक्याचा विकास व्हायला मदत होते. पण तीन वर्षाची टर्म होऊनही तालुक्याला मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही,
तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याला सत्तेत वाटा दिला पाहिजे. अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, भामा आसखेडच्या पाणीवाटपात एक लिटरही पाणी खेड तालुक्याला राहिलेले नाही. त्यामुळे कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण पिंपरी चिंचवडला एक थेंबही पाणी देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी यावेळी बोलून दाखविला. पाईपलाईन पूर्ण झाली असली तरी धरणग्रस्तांचे प्रश्न सुटले नाहीत, तर पुण्यालाही पाणी सोडणार नाही, असे ही ते म्हणाले. खेड तालुक्यावर धरणे, एम. आय. डी. सी, सेझ, रोजगार, राजकीय पदे इत्यादींबाबत सतत अन्याय झाला असून, मात्र आंबेगाव, बारामतीला पदे मिळतात, ते खेड तालुक्याला का नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

एस. ई. झेड. मध्ये बाबा कल्याणींना एक टीएमसी पाणी दिले. पुणे, पिंपरी चिंचवड, पी. एम. आर. डी. ए इत्यादींसाठी पाणी आरक्षित करण्यात आले. मग तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि वाढत्या लोकसंख्येला पाणी कुठून आणणार? प्रस्तावित नसतानाही, चासकमान धरणाचा डावा कालवा, शिरूर तालुक्यातील न्हावरा गावाच्या पुढे ७२ किलोमीटरचा कालवा करण्यात आला. खेड तालुक्यात धरणे असून पाणी आधी शिरूर तालुक्याला आणि नंतर खेडला असा अन्याय चालू आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्याने त्यांचा या पाण्यावर पहिला हक्क आहे. यासाठी कितीही किंमत मोजावी लागली, तरी मी यावर भाष्य करणार. गेल्या पाच वर्षात तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत मोठे नुकसान झाले असून माजी आमदारांनी कुठल्याही प्रश्नाबाबत भूमिका न घेतल्याने तालुका मागे गेला आहे, असे ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!