आंबेगावजुन्नरपुणे जिल्हाविशेष

किसान सभेचा पाठपुरावा : गरिबांच्या हाताला मिळवून देणार काम

 

महाबुलेटीन न्यूज
जुन्नर ( आनंद कांबळे ) : मंचर येथे उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक यशस्वी संपन्न झाली, अशी माहिती किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अमोल वाघमारे यांनी दिली.

मे 2020 मध्ये लॉक डाऊन काळात रोजगार हमीची कामे सुरू व्हावी, यासाठी किसान सभेच्या वतीने घोडेगाव ता. आंबेगाव येथे धरणे आंदोलन केले होते.

यानंतर पुणे जिल्हा परिषदेने काम मागणीचा गुगल अर्ज तयार केला होता. व मजुरांनी थेट कामाची मागणी जिल्हा परिषदेकडे केली होती.

आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यात संघटनेने पुढाकार घेऊन अधिकाधिक लोकांची काम मागणी नोंदवण्यासाठी प्रयत्न केले होते.

जुन्नर तालुक्यात संघटनेच्या पुढाकारातून सुमारे 12 गावात कामे तर आंबेगाव तालुक्यात 5 गावात व शिरूर तालुक्यात 1 गावात ही कामे सुरू झाली होती. यासाठी संघटनेने व प्रशासनाने विशेष प्रयत्न केले होते. यातून ग्रामीण मजुरांच्या हातात रोख रक्कम काही प्रमाणात का होईना थेट पोहचली.

परंतु याबरोबरच आंबेगाव तालुक्यातील प्रशासनाने मजुरांनी कामाची मागणी करूनही काम उपलब्ध करून न देणे,मजुरी कमी पडणे,काम दूर अंतरावर देणे, असे प्रकार मोठ्या स्वरूपात झाले होते. व तसेच काही प्रकार जुन्नर तालुक्यात ही झाले होते.

याबाबत वारंवार तक्रार देऊनही काहीच कारवाई न झाल्याने संघटनेने गांधी जयंती दिनाचे औचित्य साधत गावोगावी सत्याग्रह केला होता. दि. 7 ऑक्टोबर 2020 रोजी जुन्नर, आंबेगाव व शिरूर येथून पदयात्रा काढली होती. यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आश्वासनानुसार ही पदयात्रा थांबली होती.

यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली मंचर येथे जुन्नर, आंबेगाव येथील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी, गावातील प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक होऊन काही ठोस निर्णय झाले. ज्या गावात किमान वेतन पेक्षा कमी मजुरी मिळाली आहे, तेथे मजुरी वाढवून दिली जाईल.

आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील प्रत्येक ग्रामपंचायतकडे पाच कामे शेल्फवर असतील. ग्रामपंचायत मध्ये काम मागणी अर्ज असतील व कोणत्याही परिस्थितीत कामाची मागणी अर्ज नाकारले जाणार नाही.

डिसेंबर महिन्यापासून मागेल त्याला काम गावातच उपलब्ध करून दिले जाईल. जॉबकार्ड सर्व कुटुंबांना वितरित करणेसाठी आदिवासी गावात विशेष शिबिर आयोजित केले जातील. रोजगार हमीची कामे अधिकाधिक कशी सुरू होतील यासाठी प्रशासन व संघटना संयुक्तिक प्रयत्न करणार आहे.

यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांत अधिकारी सारंग कोडीतकर, जिल्हा परिषद नरेगा विभागाच्या गट विकास अधिकारी श्रीमती देव मॅडम, चोरघे सर, आंबेगाव व जुन्नर येथील तहसीलदार, गट विकास अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, रोजगार हमी विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक इ. उपस्थित होते.

यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष एड. नाथा शिंगाडे, सचिव डॉ. अमोल वाघमारे, रोजगार हमी कायद्याच्या अभ्यासक सीमाताई काकडे, विश्वनाथ निगळे, डॉ. मंगेश मांडवे, लक्ष्मण जोशी, राजू घोडे, अशोक पेकारी, कृष्णा वडेकर, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

म. गांधी यांच्या जयंतीनिमित्त किसान सभेने गांधीजींच्या विचाराने सुरू केलेली पदयात्रा नक्कीच महत्वपूर्ण ठरली. लोकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने सुरू केलेली ही संविधानिक लढाई गरीब कष्टकरी नक्कीच लढतील, असा डॉ. वाघमारे यांनी विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!