खेडचे सुपुत्र रवी घाटे यांना जागतिक CSR परिषदेचा पुरस्कार
खेडचे सुपुत्र रवी घाटे यांना जागतिक CSR परिषदेचा पुरस्कार
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर
पुणे : जागतिक CSR दिना निमित्त, जागतिक CSR काँग्रेसच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल “मोस्ट इम्पॅक्टफुल सोशल इनोव्हेटर्स लीडर्स” पुरस्कार BVG इंडिया लिमिटेड कंपनीचे सामाजिक विभाग प्रमुख, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रवी घाटे यांना, वेदांत ग्रुपच्या अनिल अग्रवाल फाऊंडेशनचे सीईओ डॉ. भास्कर चॅटर्जी यांच्या शुभहस्ते नुकताच ताज लँड्स एंड, मुंबई येथे देण्यात आला.
रवी घाटे हे गेली २५ वर्षे सामाजिक नवोन्मेषाच्या संकल्पना मांडून त्या पूर्णत्वास नेत आहेत. त्यांच्या “माहिती दळणवळण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक विकास” योगदानाबद्दलच त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ गांधीवादी नेते पद्मश्री स्व. बाळासाहेब भारदे यांच्या मुशीत घडलेल्या रवी घाटे यांनी राज्यभरात केलेल्या संगणक साक्षरतेच्या प्रसाराबद्दल त्यांना भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. राज्यातील सर्व जिल्ह्यात ७५० संगणक प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून लाखो ग्रामीण, आदिवासी, डोंगर दऱ्यातील विद्यार्थ्यांना संगणकसाक्षर करण्याच्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता.
महाराष्ट्र व दक्षिण भारतातील ५५० खेड्यातील “मोबाईल SMS कम्युनिटी न्यूजलेटर” या इनोव्हेशनसाठी त्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील १०० खेडी वेबसाईटद्वारे जगासमोर आणण्याचा देशातील पहिला (e-Panchayat) प्रयोग त्यांनी केला. देशातील नामांकित १०० सामाजिक संस्थांचा (e -NGO) तसेच शेकडो लघु–मध्यम उद्योगांना वेबसाईटद्वारे (e-MSME) जागतिक प्रवेशद्वार मिळवून देण्यात त्यांनी हातभार लावला. सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे सर्व मूलभूत अधिकार समजावेत म्हणून ऍप तयार करून प्रसिद्ध केले होते.
जगदगुरु संत तुकाराम महाराजांची गाथा डिजिटल स्वरूपात सीडी व इंटरनेटवर आणण्याच्या प्रकल्पाचे लोकार्पण तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी केले होते. संगणक महर्षी डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प साकारण्यात आला होता.
मेहतर समाजातील ५००० युवकांसाठी ‘बेहतर मेहतर प्रकल्प‘ तर १.२५ लाख SC-ST व १५ हजार अल्पसंख्यांक समाजातील युवकांसाठी “एक नयी दिशा” प्रकल्पाद्वारे, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, शासकीय योजना पोहोचविण्याचे कार्य देखील रवी घाटे यांनी केले आहे.
सोशल मीडियाचा वापर करून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना देशातील टॉप ५ सोशल मीडिया प्रोजेक्ट्समध्ये स्थान मिळाले. दुष्काळ मदत गटाने दुष्काळग्रस्त भागातील वेदना कमी करण्यासाठी काम केले. डायरेक्ट गिविंगच्या माध्यमातून रु. ८५ लाख किमतीची कामे नोंदवली गेली. ज्यांचे सरकारी मूल्य रु. २ कोटी पेक्षा जास्त आहे. फेसबुकने स्वतः, भारतातील १०० दशलक्ष वापरकर्ते झाल्याचे सेलिब्रेशन करण्यासाठी दुष्काळ मदत गटावर एक कथा प्रकाशित केली होती !
सोशल पीस फोर्स या फेसबुक ( Facebook ) वरील गटाच्या मदतीने राष्ट्रपुरुषांचा बदनामीकारक मजकूर काढून टाकून सोशल मीडियावर अशा पोस्ट्सनंतर उसळणारी हिंसा टाळण्यासाठी काम केले. डिजिटल हल्ल्यांचा सामना केवळ डिजिटल पद्धतीने केला पाहिजे, रस्त्यावर नव्हे, ही या गटाची मुख्य संकल्पना होती, या कामामुळे त्यांना समाजाच्या विविध स्तरातून प्रशंसा मिळवली.
कोबिझ व स्मार्ट सिटी – स्मार्ट स्टार्टअप या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी उद्योजकीय वृत्तीच्या शेकडो युवक – युवतींना मार्गदर्शन केलेआहे.
त्यांना आतापर्यंत मंथन अवॉर्ड, NASSCOM सोशल इनोव्हेशन ऑनर, क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्ह येस फंड अवॉर्ड यासह अनेक पुरस्कार दिले गेले व जगभरातील मोबाईल आधारित सर्वोत्तम १५ “मोबाइलद्वारे सशक्तीकरण” संकल्पनांमध्ये स्थान देण्यात आले. २०१० मध्ये Forbes India Magazine & Fast Company, USA द्वारे त्यांच्या उपक्रमाला HOT 5 स्टार्ट–अप्समध्ये स्थान देण्यात आले होते.
अनेक संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांवर शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, आयआयएम–ए, आयआयटी–बी, युनेस्को, फिक्की इ. वॉशिंग्टन पोस्ट, फास्ट कंपनी, टेक–क्रंच आणि इतर अनेक राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय मीडिया हाऊसने त्याच्या कथा प्रकाशित केल्या आहेत.
उद्योजक हणमंतराव गायकवाड यांच्या BVG इंडिया लिमिटेडचे सामाजिक प्रकल्प अधिकारी म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. कौशल्यविकास तसेच अप्रेन्टिसच्या योजनांद्वारे युवकांच्या प्रशिक्षणाचे कार्य ते मोठ्या प्रमाणात करत आहेत.
0000