कवितेतून निर्भय विचार मांडणारा कवी समाजाचा सन्मित्र : कवी सुरेश कंक
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पिंपरी : ज्येष्ठ नागरिक संघ दापोडी या सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष कवी सुभाष शहा यांच्या ‘शब्दांच्या प्रवाहातून काव्यगंगा – भाग तीन’ या कविता संग्रहाचे प्रकाशन फुगेवाडी येथील प्रवीण प्रकाशन संस्थेत कवी सुरेश कंक यांच्या हस्ते प्रकाशित झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले होते. प्रकाशक शिवाजीराव शिर्के, कवयित्री मधूश्री ओव्हाळ, निशिकांत गुमास्ते, शामराव सरकाळे, दिलीप ओव्हाळ, मुरलीधर दळवी, सुमन शिर्के यावेळी उपस्थित होते.
यावेळी कवी सुरेश कंक म्हणाले, कवी सुभाष शहा यांनी कवितेतून पुरोगामी विचार मांडले आहेत. संत एकनाथ यांनी काशीहून गंगा कावडीतून आणली. कवी सुभाष शहा यांच्या शब्दांच्या प्रवाहातून आलेल्या या काव्यगंगेचे तीर्थ साहित्यरसिकांनी प्राशन करावे आणि हा विवेकजागर करणारा काव्यसंग्रह आपल्या घरात गंगाजल म्हणून ठेवावा. कवींनी निर्भय विचार मांडून कृतिशील काम करावे अन समाजाचे मित्र बनावे.
कार्यक्रम अध्यक्ष श्रीकांत चौगुले म्हणाले, कल्पनेचा विस्तार नको तर वास्तवाची जाणीव करून देणारी आणि त्यावर उपाय सांगणारी कविता आजच्या घडीला आवश्यक आहे.
प्रकाशक शिवाजीराव शिर्के, कवयित्री मधूश्री ओव्हाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. तर प्रवीण शिर्के यांनी आभार मानले.
——-