महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : ग्रामपंचायत निवडणुकीत या गावात उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला सर्वाधिक मते, “नोटा” उमेदवाराने केले दोन्ही विरोधकांचे डिपॅाजिट जप्त,
सोलापुर जिल्ह्यातील नरखेड येथील मतदारांनी देशात घडविला इतिहास
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
सोलापूर : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी त्यांच्या पार्टीकडून एका प्रभागात एक उमेदवार म्हणून “नोटा” हाच आपला उमेदवार घोषीत केला व त्यालाच मतदान करावे, असे मतदारांना आवाहन केले होते. मतदारांनी त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत देशात इतिहास घडवला व अक्षरशः “नोटा” ला (४३४ मतदान) करून निवडून दिले. आणि उर्वरित सर्वच्या सर्व उमेदवार देखील उमेश पाटील यांच्या पार्टीचे निवडून आले.
नरखेड ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातील उमेश पाटील यांच्या पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवार सौ. वृषाली पाटील यांचा उमेदवारी अर्ज संगणकीय चुकीमुळे बाद झाला होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात उभे असलेल्या दिपाली कोल्हाळ (१४३ मतदान) व सविता खंदारे (१६३ मतदान) या दोन उमेदवारांपैकी एकालाही निवडून न देता सुज्ञ मतदारांनी “नोटा” ला ४३४ मतदान करून, ग्रामीण भागात देखील मतदार किती जागृक असू शकतो, याचे संबंध देशासमोर उदाहरण घालून दिले. सदर प्रभागामधून “नोटा” ला विजयी घोषीत करावे, अशी मागणी उमेश पाटील यांनी केली असून, राज्य निवडणूक आयोगाला तसे पत्र देखील दिले आहे.
दि.६/११/२०१८ रोजी राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र आदेश काढून, “नोटा” ला काल्पनिक उमेदवार घोषीत केले आहे. अशा परिस्थितीत सदर ठिकाणी “नोटा” ला सर्वाधिक मतदान झाल्यास, त्या ठिकाणी फेर निवडणूक घेण्याची तरतुद केली आहे. परंतु सदर आदेश २०१८ मधील नगरपालिका निवडणुकीच्या काळात काढण्यात आला होता. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सदर नियम लागू आहे किंवा नाही या बाबतीत प्रशासनात संभ्रम आहे.