या गावात गोमातेच्या स्मृती जतन करण्यासाठी लावले जातात वृक्ष
गोमातेसाठी ‘स्मृतिवृक्ष’
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
शेतकऱ्याचा बैल, गाय इ. मुक्या प्राण्यांवर फार जीव असतो. त्याच्या कुटूंबाचे ते जणू सदस्यच असतात. या मुक्या प्राण्यांना ते जीवापाड जपतात. रानमळा गावातील शेतकरी श्री. राजाराम जाधव यांच्याकडे ‘ मोरी ‘ नावाची एक दुभती गाय होती. या गाईमुळे त्यांच्या प्रपंचाला आर्थिकदृष्टया खूप फायदा झाला. ती म्हातारी होऊन मरण पावली. राजाराम जाधव यांनी त्यांच्या घराशेजारीच खड्डा खोदून या मोरी गाईचं दफन केलं. तिच्या स्मृति जपण्यासाठी त्या जागेवर एक आंब्याचं झाड लावलं. संयुक्त वन व्यवस्थापन समिती रानमळा या संस्थेने त्यांना केशर आंब्याचं कलमी रोप दिले. या संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. टी. शिन्दे यांनी नुकतीच भेट देऊन या झाडाची पाहणी केली. राजाराम आणि त्यांच्या पत्नी या झाडाचं जीव लावून अतिशय उत्तम प्रकारे संगोपन करतात. श्री. पी. टी. शिंदे यांनी दोघांनाही धन्यवाद दिले.
रानमळा गावातीलच ह. भ. प. श्री. कैलास हरिभाऊ वाघोले या शेतकऱ्याची कपिला ( मोरी ) गाय मरण पावली. कुटुंबातील सर्वांनाच खूप दुःख झालं. त्यांनी आपल्या आवडत्या गोमातेच्या स्मृती जपण्यासाठी घरा जवळच खड्डा घेऊन त्यात दफन केले. रानमळा संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्याक्ष श्री. पी. टी. शिंदे यांनी आंब्याच्या केशर आंब्याचं रोप समितीच्यावतीने दिले. कपिला गाय दफन केलेल्या खड्डयावर ते आंब्याचं झाड लावले. वाघोले कुटुंबीय गाईच्या आठवणी या झाडाच्या रूपाने जपत आहे.
रानमळा गावात ‘ रानमळा पॅटर्न ‘ प्रमाणे कुटूंबातील मृत व्यक्तीच्या स्मृति झाड लावून जपल्या जातात. आता ‘गोमाता-स्मृतीवृक्ष’ लावण्याची नवीन संकल्पना रानमळा गावातील नागरिकांनी सुरु केली आहे. त्यामुळे त्या प्राण्याशी व वृक्षाशी भावनिक नातं जपलं जातं.
— पी. टी. शिंदे ( अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती )