इतरकृषीखेडपुणे जिल्हाविशेषसत्कार / सन्मान / पुरस्कार

गांधी विचारातूनच सशक्त भारत घडेल: डॉ कटारिया

महाबुलेटिन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर: भारताला सशक्त बनविण्याची ताकद गांधी विचारातच आहे. काळाच्या ओघात गांधी विचारांचे महत्व वारंवार अधिरेखीत झाले आहे, त्यामुळे गांधी विचारांची कास धरावी. असे आग्रही विचार डॉ राम कटारिया यांनी मांडले.
              राजगुरूनगरमधील कांदा व लसूण संशोधन संचालनालय,  येथे  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करण्यात आली. संचालनालयाचे कर्मचारी, शेतकरी व पत्रकार या कार्यक्रमात सहभागी होते. या प्रसंगी कर्मचार्‍यांकडून स्वच्छतेबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. संचालनालयाचे संचालक डॅा. मेजर सिंह आणि प्रमुख अतिथी डॉ. राम कटारिया यांनी दीप प्रज्वलित केले. महात्मा गांधी यांच्या जीवनावरील माहितीपट यावेळी दाखविण्यात आला.
            गांधी तत्वज्ञानाचा अंगीकार करणारे डॉ.राम कटारिया यांनी आपल्या भाषणात, गांधीजींनी इंग्रजांविरूद्ध जसा लढा दिला तसाच लढा आजच्या काळात अशक्तपणा, अमिबियासिस, अनिमिया आणि अस्वच्छता यांच्या विरोधात देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. त्ते पुढे म्हणाले की, ‘मी भारतासाठी आहे आणि मी माझ्यापासून सुरूवात करून, भारताला सक्षम बनवीन’ असा विचार प्रत्येक भारतियाने करून सर्वांनी आळशीपणा सोडला पाहिजे आणि स्वच्छ व निरोगी भारतासाठी गांधीवादी विचार आत्मसात करण्यास स्वतःला प्रवृत्त केले पाहिजे. त्यांनी या वेळी ‘प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी निसर्गाकडे पुरेसे असते परंतु प्रत्येकाचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी नाही’ या गांधीवादी विचाराची उपस्थितांना आठवण करून दिली.
         लोकसंख्येच्या विस्फोटावर त्यांनी चिंता व्यक्त केली. भारताच्या समग्र प्रगतीत आणि पर्यावरण ऱ्हासास लोकसंख्या हे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सप्रमाण सांगितले.. दरमाणसी जमिनीचे प्रमाण लक्षात घेता ऑस्ट्रेलियात पंधराशे एकर तर भारतात चार गुंठे असे आहे. यावरून पुढील पिढीच्या भवितव्याचा अंदाज घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या सहजसुंदर शैलीने डॉ राम कटारिया यांनी उपस्थितांना जिंकले. संशोधक डॉ राजीव काळे यांचे विशेष आभार आपल्या भाषणात डॉ कटारिया यांनी मानले.
          यावेळी निबंध लेखन, वादविवाद स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२० दरम्यान आयोजित करण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धेच्या पहिल्या तीन विजेत्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रवर्गातील प्रत्येक वर्गातील महिलांपैकी महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच कांद्याचे बियाणे, खते, कीटकनाशके आणि शेती संबंधी अवजारांचा गरीब शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
           कांदा लसूण संशोधन केंद्राचे संचालक डॉ. मेजर सिंह यांनी डॉ. कटारिया यांच्या कार्याचे आणि विचारांचे कौतुक केले. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की साधेपणा आणि आंतरिक सामर्थ्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ निर्माण होईल. ‘जय जवान जय किसान’ अशी घोषणा देणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे योगदानही महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माध्यमांच्या प्रशंसनीय कार्याबद्दल मीडिया कर्मचार्‍यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय महाजन व आभार प्रदर्शन श्री. अमरेंद्र किशोर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!