दर्जेदार कांदा बियाणे निर्मितीत महाराज्य ग्रुपचे दमदार पाऊल ● महाराज्य ग्रुप व नाफेडचा संयुक्त प्रकल्प ● देशातील पहिलाच प्रयोग
दर्जेदार कांदा बियाणे निर्मितीत महाराज्य ग्रुपचे दमदार पाऊल
● महाराज्य ग्रुप व नाफेडचा संयुक्त प्रकल्प
● देशातील पहिलाच प्रयोग
महाबुलेटिन न्यूज : शिवाजी आतकरी
नासिक : कांदा बियाणांची कमतरता, कांदा बियाणांचा दर्जा आणि शेतकऱ्यांची होणारी फसवणूक हे लक्षात घेता महाराज्य ग्रुप ऑफ फार्मर प्रोड्यूसर कंपनीने एक दमदार पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या नाफेड या अंगीकृत संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार व गुणवत्ता असलेले कांदा बियाणे तयार करण्यात येत आहे. नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबवला गेला आहे. नाफेड आणि फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांनी संयुक्तपणे राबवलेला देशातील हा पहिला प्रकल्प आहे. शेतकरी हित जोपासले जाणाऱ्या या प्रकल्पाचे यश आता अंतिम टप्प्यात आले आहे.
गेल्या काही वर्षात कांदा हे पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरत आहे. मात्र कांदा बियाणे, त्याचा भाव, दर्जा या बाबी लक्षात घेता शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसत होती. चढ्या भावातील कांदा बियाणे, उगवण क्षमता कमी असणारे बियाणे यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत होती. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या नाफेड या संस्थेने महाराज्य ग्रुप ऑफ फार्मर प्रोड्युसर कंपनी सोबत एक नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. गुणवत्ताक्षम, दर्जेदार कांदा बियाणे निर्मिती करण्याचा हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे. कांदा बीज प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या कांद्याचे फुलोऱ्यात रूपांतर झाले आहे. कांदा बीज उत्पादन हे परपरागीभवन असल्याकारणाने परागीकरण उत्तम होण्यासाठी महाराज्य ग्रुप ऑफ फार्मर्स प्रोडूसर कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब त्यामध्ये केला आहे.
● कांदा बीजोत्पादनासाठी मधमाशी पेटी…
महाराज्य ग्रुप ऑफ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कंपनीमार्फत राबविण्यात येणाऱ्या या प्रयोगातील भाग म्हणून मधमाशी पेटींचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले. उत्तम परागीभवन होण्यासाठी ही उपाययोजना केली आहे. कांदा बीजोत्पादन पीक फुलोरा अवस्थेत असून परागीभवनासाठी आवश्यक घटक असलेल्या मधमाशीची संख्या खूप कमी आहे. कांदा पूर्णपणे परपरागीभवन असलेले पीक असून परागीभवन हे मधमाशी द्वारे होते. या वर्षी मधमाशीचे प्रमाण कमी असल्याकारणाने काही फुलात परागीभवन होत नाही. व परागीभवन न झाल्याने फुले वाळून जातात. त्यास फुली, मोरणी पडणे असे म्हणतात. फुलांमध्ये फलन न झाल्याने बियाण्याचे उत्पन्न कमी होते. तसेच बियाण्यांची गुणवत्ता कमी होते. सध्याची सदर परिस्थिती पाहता परिसरात मधमाशींचा वावर कमी असल्याने कांदा बियाणे तयार होण्यास अडचणी येत होत्या.
महाराज्य ग्रुप ऑफ फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन सुरेश पवार, सीईओ शिवाजी आतकरी, डायरेक्टर गणेश पवार यांच्या संकल्पनेतून कांदा बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यास प्रत्येकी एक मधमाशी पेटी उपलब्ध करून दिली आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. परागीभवन, मधमाशीचे महत्व संगोपनाबाबत शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञ तुषार आंबरे ( एमएसस्सी, horticulture ), अनिल आहिरे, सुदर्शन भामरे, कुंदन निकम, राहुल साळवे यांनी शास्त्रोक्त माहिती देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बीजउत्पादन एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे महाराज्य ग्रुपचे चेअरमन सुरेश पवार यांनी सांगितले.
■ “शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन महाराज्य ग्रुपने हा प्रकल्प भारत सरकारच्या नाफेडसाठी हाती घेतला आहे. यात दर्जेदार बियाणे उत्पादित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नाफेडचे वरिष्ठ अधिकारी आणि तंत्रज्ञ यांच्या मार्गदर्शन यातून हा प्रयोग यशस्वी होत आहे. साधारण 250 टन कांदा बियाणे उत्पादित करण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कमी भावात दर्जेदार व गुणवत्ताक्षम बीज ( बियाणी ) देण्याचा हा प्रयत्न आहे. यामध्ये काही बियाणे निर्यात करण्याचे उद्दिष्ट देखील ठेवण्यात आले आहे. हा प्रयोग यशस्वीतेच्या मार्गावर असून एप्रिल पासून बीज उत्पादन होणार आहे. उत्पादित करण्यात येत असलेले बियाणे गुणवत्तेच्या निकषावर दर्जेदार असणार आहे. त्याची उगवण क्षमता उत्तम असणार आहे. तंत्रज्ञानाचा आणि सेंद्रिय पद्धतीचा अधिकाधिक वापर करून हे कांदा बियाणे बनवण्यात येत आहे. शास्त्रज्ञ तुषार आंबरे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले असून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना झाला”.
— सुरेश पवार,
चेअरमन, महाराज्य ग्रुप ऑफ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड
——
■ “शेतकऱ्यांचे संघटन करून, कांदा उत्पादनात बियाणांचे महत्व लक्षात आणून देऊन शेतकऱ्यांना एकत्रित केले. बीज उत्पादन प्रक्रियेत असणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान याचे मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवण्यात आले. ‘शेतकऱ्यांनी’ शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेले बियाणे’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हा प्रयोग करण्यात आला. शेतकऱ्यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प यशस्वी होईलच. यातून निर्माण झालेले बीज शेतकऱ्यांसाठी कमी भावाने वितरित करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. प्रती हेक्टरी उत्पादन वाढावे, शेतमालाला अधिकाधिक भाव मिळावा, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जावे, यासाठी आम्ही महाराज्य ग्रुपचे चेअरमन सुरेश पवार, सीईओ शिवाजी आतकरी, नाफेडचे अधिकारी, बीज उत्पादनातील तंत्रज्ञ यांच्या परिश्रमातून व दुरदृष्टीतून हे प्रयत्न सुरू आहेत.”
— गणेश पवार
डायरेक्टर, महाराज्य ग्रुप ऑफ एफपीसी
—–