कोरोनानागरी समस्यापुणे जिल्हापुणे शहर विभागविशेषहवेली

दंडात्मक कारवाई उरुळी कांचनमध्ये, अन पावत्या मात्र पुणे महानगर पालिकेच्या… ● पुणे शहर पोलिसांचा अजब कारभार… ● वारंवार तक्रार, विनंती, करूनही पोलीस देईनात दाद ! ● ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांची तक्रार.

दंडात्मक कारवाई उरुळी कांचन मध्ये, अन पावत्या मात्र पुणे महानगर पालिकेच्या…
● पुणे शहर पोलिसांचा अजब कारभार…
● वारंवार तक्रार, विनंती, करूनही पोलीस देईनात दाद !
● ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांची तक्रार.

महाबुलेटीन न्यूज : सुनील जगताप
उरुळी कांचन : दंडात्मक कारवाई उरुळी कांचनमध्ये, अन पावत्या मात्र पुणे महानगर पालिकेच्या असा पुणे शहर पोलिसांचा अजब कारभार येथे पाहायला मिळत आहे. याबाबत तक्रार, विनंती, करूनही पोलीस दाद देत नाहीत. याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी तक्रार केली आहे.

दंडाच्या पावत्या जर पुणे महानगरपालिकेच्या फाडताय, तर मग लॉकडाऊनचे नियम का ग्रामीणचे लावताय ? असा सवाल सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांनी पोलीस प्रशासनाला केला आहे.

उरुळी कांचन गाव हे लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पुणे शहर पोलिसांच्या अखत्यारीत गेले आहे. पुणे महानगरपालिकेचा आणि उरुळी कांचन गावाचा दुरान्वयेही संबंध नाही. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या धोरणाप्रमाणे पोलीस कारवाई करताना, पोलिस विभाग हा दंडात्मक कारवाईसाठी पुणे महानगरपालिकेच्या पावती पुस्तकांचा वापर करीत आहे. वारंवार तोंडी लेखी तक्रार करूनही पोलीस खात्याकडून याबाबत कोणतीही सुधारणा झालेली नाही. वरीष्ठ लोकप्रतिनिधीही या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच जिल्हा प्रशासनही या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.

                 शहर पोलीस ग्रामीण जनतेला नाहक त्रास देत आहेत. शेतकरी वर्गावर देखील कारवाई करून पाचशे-पाचशे रुपयांच्या पावत्या फाडल्या जात आहेत. लॉकडाऊन व कोरोना संसर्ग याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी वर्ग, मोलमजुरी करून जगणारा सामान्य माणूस आर्थिक अडचणीत सापडलेला असताना… खिशात पैसे नसताना… जगण्याची भ्रांत असताना हा पोलिसी खाक्या ग्रामीण जनतेवर अन्याय करत असून प्रशासनाकडे याबाबत दाद मागूनही हातात निराशा येत आहे. यावर तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन जिल्हा प्रशासनाने योग्य ते निर्देश पोलिस खात्याला देणे गरजेचे आहे, अशी मागणी सरपंच संतोष कांचन यांनी केलेली आहे. तसेच आम्हाला पुणे शहर आयुक्तालयातून बाहेर काढून पूर्वीसारखेच ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत ठेवावे जेणेकरून ग्रामीण भागाशी नाळ जोडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा व स्थानिक जनतेचा समन्वय चांगल्या पद्धतीने राहून अडचणी सोडवताना त्रास होत नाही, असे निवेदन जिल्हाधिकारी पुणे यांना देणार असल्याचे कांचन यांनी सांगितले.

उरुळी कांचन गाव हे शहर पोलिसांशी जोडले गेले बाबत स्थानिक आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत उरुळीकांचन व परिसर हा ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतच ठेवण्याचा निर्णय झाला होता, मात्र आदेश काढताना अशा पद्धतीने का निघाला? हे मलाही सांगता येणार नाही. मात्र माझा आग्रह उरुळी कांचन व परिसर हा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यातच राहण्यासाठी आहे.”

● जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे या हद्दीतील व्यवसायिक निर्बंध पोलिसांकडून पाळले जातील. या ठिकाणचा रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १३.८४ टक्के आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखालील समितीने या ठिकाणचे व्यवहार ग्रामीण भागाप्रमाणे सकाळी ७ ते ११ या वेळेत करण्याचे निश्चित केले आहे. शेती व निगडीत व्यवसाय कामांना सूट देण्याचे निर्देश आहेत. तर दंडात्मक पावत्यांच्या बाबत माहिती घेवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल.
— नागेश गायकवाड, ( पोलिस अधिकारी, पुणे शहर पोलीस गृह शाखा )
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!