निवडणूकमहाराष्ट्र

चाकणच्या रस्त्यांवर अवजड वाहतूकीमुळे सातत्याने वाहतूक कोंडी

महाबुलेटीन न्यूज
चाकण :
औदयोगिक क्षेत्रात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे चाकणचे रस्ते खिळखिळे होत आहेत. लोकसभेच्या निवडणुका आल्या कि चाकण-तळेगाव-शिक्रापूर व पुणे-नासिक महामार्गाच्या रुंदीकरणासाठी सर्व्हे होतो, टेंडर काढले जातात, मात्र रस्त्यांचे काम काही होत नाही. हे चित्र गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून पाहायला मिळत आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी आता एम आय डी सी ने घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

चाकण येथील मोठ्या प्रमाणावर असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे अवजड वाहतूक वाढली आहे. अवजड वाहनांना येजा करण्यासाठी चाकण एमआयडीसीतील निघोजे मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. तरीही ही वाहने वाहतूक पोलिसांना झुगारून खराबवाडी, महाळुंगे मार्गाने जातात. अवजड वाहनांमुळे काही ठिकाणी रस्ते उखडले असून रस्त्यांवर वाहतूक कोंडीही होत आहे. मागील दोन महिन्यापूर्वी चाकण-तळेगाव रस्त्यावरील खड्डे बुजवून मलमपट्टी केली असली तरी नागरिकांकडून रस्ते रुंदीकरणाची मागणी सातत्याने होत आहे.

चाकण-तळेगाव-शिक्रापूर व पुणे-नासिक महामार्गावर खड्डे पडल्यानंतर संबंधित खाते व रस्ते कंपनी दुर्लक्ष करीत आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्याची चाळण होत असून रस्ते दुरुस्तीकडे सबंधित खात्याने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी साईड पट्ट्या, सर्व्हिस रस्ते खचले आहेत. हे रस्ते दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!