चाकण-तळेगाव रस्त्यावरील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा, नागरिकांनी घेतला मोकळा श्वास!
अतिक्रमणे काढली तर पहिला रस्ता करा, नाहीतर पुन्हा अतिक्रमणे होतील – मनसे युवानेते मनोज खराबी
सोमवारपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूने अडीच मीटर रस्ता डांबरीकरण करणार – शाखा अभियंता राहुल बोंदार्डे
महाबुलेटीन न्यूज
चाकण : चाकण-तळेगाव रस्त्यावरील खराबवाडी येथील अतिक्रमणांवर आज सार्वजनिक बांधकाम विभागाने धडक कारवाई करून रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूची साडेबारा मीटर पर्यंतची अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने हटविली. त्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतला.
अतिक्रमणे काढल्यानंतर नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी पुन्हा अतिक्रमणे होण्याअगोदर प्रशासनाने त्वरित रस्त्याचे काम सुरु करावे. रस्ता झाला नाहीतर या ठिकाणी नागरिक पुन्हा अतिक्रमण करतील, त्यामुळे प्रशासनाने रस्त्याच्या बाबतीत तत्परता दाखवावी.
– मनोज खराबी ( जिल्हाध्यक्ष मनसे कामगार सेना )
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या लगत अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना नोव्हेंबर २०२२ मध्ये १५ दिवसांच्या मुदतीत रस्त्याच्या
मध्यरेषेपासून १५ मीटर अंतरावरील अतिक्रमण काढण्याच्या लेखी सूचना दिल्या होत्या. त्यावर नारिकांनी तत्परता दाखवून डिसेंबर महिन्यात स्वतःच अतिक्रमण काढून बांधकामे मागे घेऊन दुरुस्ती केली. तरीही काही ठिकाणी अतिक्रमणे ‘जैसे थे’ राहिल्याने बांधकाम विभागाने अतिक्रमणे काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागितला होता. महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त देण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राहुल बोंदार्डे, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव यांच्या उपस्थितीत चोख बंदोबस्तात रस्त्याच्या कडेला असणारी कच्ची व पक्की अतिक्रमणे हटविण्यात आली. यासाठी खराबवाडी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे, वरिष्ठ लिपिक अजित केसवड व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य केले.
केवळ अतिक्रमण काढून या रस्त्याचा वाहतूक कोंडीचा प्रश्न
मिटेल का? असा प्रश्न आता सुज्ञ नागरिकांच्याकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यालगतची काही झाडे पाडल्यानंर पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली. तसेच या अतिक्रमणात प्रशासनाचे सूचना दर्शक फलकही भुईसपाट करण्यात आले.
प्रशासनाने आज चाकण-तळेगाव रस्त्यावर खराबवाडी येथून
अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली असून त्यास स्थानिक नागरिक व प्रशासन सहकार्य करीत असल्याचे दिसून आले.
आम्ही शासनाच्या जागेवर अतिक्रमण केले असून ते कधीना
कधी निघणारच होते, पण हे अतिक्रमण काढून तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचा जो मागील १० ते १५
वर्षांपासूनचा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे तो सुटेल का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
चाकण येथील तळेगाव चौकापासून नाणेकरवाडी, खराबवाडी, महाळुंगे, खालूंब्रे, सुधापूल, देहूफाटा, तसेच मावळ तालुक्यातील इंदोरी, माळवाडी व तळेगाव हद्दीत सुद्धा ही अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राहुल बोंदार्डे यांनी सांगितले. तसेच सोमवारपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला अडीच मीटर डांबरीकरण सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, या रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे होते ते आम्ही बुजविले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणामुळे खराबवाडी येथील जिल्हा परिषद शाळा व नवमहाराष्ट्र विद्यालय या शाळांच्या भिंती शाळा व्यवस्थापनाने आत बांधून घेतल्यानंतर तेथे डांबरीकरण करण्यात येणार आहे. १ फेब्रुवारी नंतर चाकण-शिक्रापूर रस्ता आमच्या विभागाकडे वर्ग होणार असून त्यानंतर त्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.