चाकण एमआयडीसीत होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक
महाबुलेटीन न्यूज
चाकण : येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहतीच्या ( MIDC ) पाचव्या टप्प्यात सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांशी शासनाने सामंजस्य करार केले आहेत. येत्या वर्षभरात विविध कंपन्यांची पन्नास हजार कोटींची गुंतवणूक होणार असल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल यांनी दिली.
पाचव्या टप्प्यासाठी जमिनीचे संपादन एमआयडीसीने केले आहे. त्याचा मोबदला बहुतांश शेतकऱ्यांना दिला आहे. सुमारे ६३७ हेक्टरवर पाचवा टप्पा होत आहे. त्यामुळे पंचवीस हजारावर लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पाचव्या टप्प्यात चाकण, वाकीखुर्द, आंबेठाण, रोहकल, गोनवडी, बिरदवडी या गावातील जमिनींचे संपादन केले आहे. सुमारे दोनशे कोटी मोबदल्याचे वाटप करण्यात आले आहे.
काही प्रकरणे न्यायालयात गेल्याने त्या शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप केले नसल्याचे खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.
● नव्या वर्षाची मोठी गुंतवणूक :- एमआयडीसीने जमिनीचे संपादन केल्यानंतर हजारो कोटींची गुंतवणूक येत्या वर्षभरात होणार आहे. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होणार आहे. वर्षभरात कंपन्यांची कामे सुरू होतील, असे चित्र आहे.