भामा-आसखेड प्रकरणी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार : माजी आमदार सुरेश गोरे
भामा-आसखेड शेतकाऱ्यांवरचे गुन्हे मागे घ्या, अन्यथा शिवसेना आंदोलन करणार
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
शिंदे-वासुली ( दि.४ सप्टेंबर ) : आम्ही सुरुवातीपासूनच भामाआसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांबरोबर होतो आणि आजही आहे. खेडच्या लोकप्रतिनिधींच्या चूकीच्या भूमिकेमुळे भामा-आसखेड आंदोलन चिघळले, असा गंभीर आरोप खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर माजी आमदार सुरेश गोरे यांनी केला.
भामा आसखेड आंदोलनप्रकरणी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी चाकण येथील त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार सुरेश गोरे यांनी भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांवर झालेले खोटे गुन्हे मागे घेऊन मुक्त करा व ठरल्याप्रमाणे एक किमी जलवाहिनेचे काम बंद ठेवा, अन्यथा शिवसेना आंदोलन करणार ! असा इशारा त्यांनी यावेळी दिला. भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांवर झालेला अन्याय व मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे साकडे घालणार असल्याचे माजी आमदार सुरेश गोरे यांनी चाकण येथील संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
. यावेळी माजी आमदार सुरेश गोरे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, माजी उपसभापती भगवान पोखरकर, शिवसेना ग्राहक संरक्षण सेनेचे जिल्हा उपप्रमुख लक्ष्मण जाधव, बिपीन रासकर उपस्थित होते.
भामा आसखेड शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज का पडली ? पालकमंत्र्यांच्या बैठकीत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांविरुद्ध भूमिका का घेतली ? अशी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे नाव न घेता घणाघाती टीका माजी आमदार सुरेश गोरे यांनी केली. शिवसेना व आपली भूमिका स्पष्ट करताना ते बोलत होते.
माझ्या पाच वर्षांच्या काळात भामाआसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांबरोबर राहून अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी आम्ही शिवसैनिकांनी प्रथम तोडफोड करुन आंदोलन केले. आमच्या वर गुन्हे दाखल झाले. अनेकवेळा जिल्हा प्रशासन व शेतकऱ्यांचा बैठका घेऊन मध्यस्थीची यशस्वी भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. माझ्या वेळी शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज पडली नाही. परंतु मागील विधानसभेच्या निवडणुकीमुळे लोकप्रतिनिधी बदलले आणि तालुक्याचे चित्र बदलले. या लोकप्रतिनिधींनी शेतकरी विरोधी भूमिका घेतली. दिलेले आश्र्वासन पाळले नाही. पालकमंत्र्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांची बाजू घेण्यापेक्षा भामाआसखेड आंदोलकांवर एजंट असल्याचे आरोप केले. वास्तविक लोकप्रतिनिधीने जनतेच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. परंतु घेतलेल्या चुकीच्या भूमिकेमुळे आंदोलन चिघळले. आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करुन जेल मध्ये टाकले गेले हे लोकप्रतिनिधींमुळेच. पालकमंत्र्यांकडे चुकीची व स्पष्ट माहिती न दिल्याने निर्णय घेता आला नाही. असे गंभीर व धक्कादायक आरोप केले.
माझ्या काळात तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी भामाआसखेड पुनर्वसनाचे सर्व प्रश्र्न कायमस्वरूपी सुटेपर्यंत आसखेड खुर्द हद्दीतील एक किलोमीटर जलवाहिनीचे काम बंद ठेवण्याचे आश्र्वासन दिले होते. त्या बैठकीला मी उपस्थित होतो, असे सांगून प्रकल्पग्रस्तांनी जलवाहिनेचे काम बंद करण्यासाठी घेतलेल्या भूमिकेला दूजोरा दिला आहे. गेले आठ दिवस तालुक्याचे लोकप्रतिनिधी भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत काय भूमिका घेतात याकडे आमचे लक्ष होते. त्यांनी काही शेतकऱ्यांवर एजंट असल्याचा आरोप केला असला तरी त्यांची चौकशी लावा, पण बाकी शेतकऱ्यांवर अन्याय का ? म्हणून शिवसेना भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांबरोबर असून प्रकल्पग्रस्तांना बरोबर घेऊन पालकमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे जावून पुनर्वसनाचे प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार असल्याची माहिती सुरेश गोरे यांनी दिली.
जिल्हा प्रशासन चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची शासनाची दिशाभूल करत आहे. खासबाब हेक्टरी १५ लाख रुपये अनुदान ९०० शेतकऱ्यांना वाटप करावे, न्यायालयात गेलेल्या व जमीन वाटपाचा आदेश झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या ताब्यातील जमीनीचा वाटप करावा या व अन्य मागण्यांसाठी माननिय मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे.
यावेळी लोकप्रतीधींनी जनतेबरोबर असायला पाहिजे पण आमचा व तालुक्याच्या जनतेचा अपेक्षाभंग झाला. शेतकऱ्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या व जलवाहिनेचे काम बंद करा, शेतकऱ्यांसाठी प्रशासकीय पातळीवर काही करण्यास तयार असून पुढील काळात भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन करण्याचा इशारा खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांनी सांगितले.
माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून शिवसेना शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी असूनही खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच भामाआसखेड आंदोलन पेटले, असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांनी केला. आता आजी-माजी आमदार भामा-आसखेड प्रकरणी एकमेकांच्या पुढे उभे ठाकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. एजंटगीरी वरुन थेट आरोप करुन एजंटच एजंटाला ओळखतो, अशी टिका त्यांनी यावेळी केली.