नाही तर आम्हाला पवन मावळासारखा गोळ्या घाला : आंदोलक शेतकरी
भामा-आसखेड शेतकऱ्यांच्या जेलभरो आंदोलनाचा उद्रेक
महाबुलेटीन न्यूज : दत्ता घुले
शिंदे-वासुली, दि.३१ ऑगस्ट : अखेर “भामा आसखेडग्रस्तां’नी आज सकाळी ११ वाजेपासून आर या पारच्या लढाईला सुरुवात केली. प्रकल्पबाधीत कोळीये, खरवली, वेल्हावळे, शिवे, वहागाव आदी गावातील शेतकरी करंजविहीरे येथे, तर पाईट, पाळू परिसरातील वाचू, टेकवडी, अनावळे, पराळे, कासारी आदी गावातील शेतकरी धामणे फाटा येथे असे २३ गावातील सुमारे ८५० शेतकरी बायका मुलांसह धरणे व जलभरो आंदोलनासाठी जमा झाले होते. परंतु पोलीस प्रशासनाने आसखेड खुर्द फाटा, जलवाहिनी परिसर, तळशेत, धामणे फाटा, करंजविहीरे आदी ठिकाणी कडक नाकाबंदी केली होती. तरीही मिळेल त्या रस्त्याने येऊन शासनाविरुद्ध आपला एल्गार पुकारला. आंदोलनकर्त्यांनी जलवाहिनेचे काम बंद करा, नाहीतर आंदोलन सुरूच ठेवणार अथवा आमच्यावर कारवाई करा, असा आक्रमक पवित्रा घेतला.
ठिकठिकाणी नाकाबंदी करुन आंदोलकांना एकत्र येऊ न देण्याची पोलीस प्रशासन खबरदारी घेत होते. सरतेशेवटी तळशेत जवळ सर्व प्रकल्पग्रसत शेतकरी एकत्र येऊन शासनाचा निषेध करत आंदोलन सुरू केले; परंतु पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवाहन केले. व सर्व धरणग्रस्तांनी चाकण पोलीस ठाण्यामध्ये जाऊन हल्ला बोल करण्याचा विचाराने पिंजरा गाडीत बसले. परंतु पोलिसांनी चाकणकडे निघालेल्या गाड्यामध्येच थांबवून दुसरीकडेच नेण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांचा डाव ओळखून प्रकल्पग्रस्तांनी गाड्यांमधून उड्या घेत जलवाहिनीकडे धाव घेतली. परंतु पोलीस प्रशासन शेतकरी जमावाची पांगापांग करण्यात यशस्वी झाले. दरम्यान, काही आंदोलक महिला व पुरुष काट्याकुट्यातून, आडमार्गाने, शेतातून जलवाहिनीवर येऊन धडकले. व जलवाहिनीच्या पाइपावर येऊन बसले. त्यामुळे जलवाहिनेचे काम ठप्प झाले.
आंदोलक वृद्ध शेतकरी गंभीर जखमी…
एक वयोवृद्ध शेतकरी गबाजी सातपुते आंदोलनादरम्यान धामणे घाटात पिंजरा गाडीतून पडल्याने गंभीर जखमी झाले असून करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहे. तर दुसरा एक शेतकरी मारुती बांदल यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान तळशेत जवळील धामणे फाट्यावर प्रकल्पग्रस्त व पोलीसांमध्ये झटापट झाली. शेतकरी जलवाहिनीकडे जाऊन काम बंद करण्यात आग्रही होत, तर पोलीस शेतकऱ्यांना जागचे हालून देत नव्हते. पोलीसांनी खबरदारी म्हणून काही आंदोलन प्रमुखांना बळजबरीने गाडीत कोंडले होते. परंतु बाकीचे शेतकरी गाडीला आडवे होऊन रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.
शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली व तहसीलदार सुचित्रा आमले आले होते. त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु जलवाहिनेचे काम बंद करा, मगच आंदोलन मागे घेतो, असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सगळे शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते; परंतु आंदोलन दडपण्यासाठी पोलीसांकडून बळाचा वापर केला. आंदोलकांना वेगळे केले, काहींना बळजबरीने गाडीत घातले, काही वेळा झटापट झाली, बऱ्याचदा शाब्दिक बाचाबाची झाली, काही आंदोलक महिलांना महिला पोलीसांनी गचलले व अरेरावीची झाली. त्यामुळे आंदोलक अक्रमक झाले. पण कुणाकडूनही उद्रेक वा अनुचित प्रकार झाला नाही. परंतु आंदोलकांनी पोलीस प्रशासनाचा ही निषेध केला.
हे आंदोलन आमच्या हक्कासाठी आहे. सर्वच पक्षांनी आमचा वापर केला. आता आमच्या साठी ना सत्ताधारी, ना विरोधी पार्टी. पालकमंत्र्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडले. योग्य न्याय केला नाही पालकमंत्र्यांच्या विरोधात एकेरी नावाने निषेधात्मक आरोप केले.
शेवटी आंदोलक स्वत:हून अटक होऊन गाडीत जाऊन बसले. सुमारे पाच ते सहा बस भरुन चाकण पोलीस स्टेशनला नेण्यात आले. उचललेल्या सर्व आंदोलकांना चाकणच्या एका मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. पोलीसांकडून शेतकऱ्यांवर काय कारवाई केली जाणार आहे, त्यांच्या वर गुन्हे दाखल करणार कि, समज देऊन सोडणार आहे, याबाबत अद्याप काहीही माहिती पोलिसांनी दिली नाही.
आज भामाआसखेड ग्रस्तांनी शांततेच्या मार्गाने जलभरो आंदोलन केले असले, तरी पुढील काळात आंदोलन भडकणार आहे. आजच शेतकऱ्यांनी काम बंद करा, नाहीतर आम्ही कामावर जाऊन काम बंद करु, असा पवित्रा घेतला. तुम्ही लाठ्यांनी मारा, झोडा, नाही तर आम्हाला पवन मावळासारखा गोळ्या घाला, नाहीतर आम्ही धरणात उड्या मारून जलसमाधी घेतो, आत्मदहन करतो अशी आक्रमक भूमिका घेतली होती.
——