बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी, यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील हेही उपस्थित होते.
बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यामुळे त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या शर्यती सुरू व्हाव्यात यासाठी केंद्रीय सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. महाराष्ट्राची ४०० वर्षापूर्वीची परंपरा, बैलगाडा मालक व शौकीन यांच्या भावना, देशी गोवंशाचे रक्षण व ग्रामीण पर्यटनाला चालना या हेतूने बैल या प्राण्याचा संरक्षण यादीतील समावेश वगळावा, म्हणजे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होतील, अशी विनंती डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली.