आंदोलनखेडपिंपरी चिचंवडपुणे जिल्हामहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा सुजान नागरिक मंचचा इशारा

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा सुजान नागरिक मंचचा इशारा

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड : राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी सुजान नागरिक मंचच्या वतीने ईमेलद्वारे निवेदन पाठवून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे वा ना घेणे या विषयावर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार फक्त यु जी सी लाच आहेत. सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा कहर झाला आहे. कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय तसेच नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. शाळा कॉलेज आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्र बंद आहेत. घराबाहेर पडणे म्हणजे कोरोनाला बळी पडणे असे भयानक संकट आपल्यावर आले आहे. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने दहावी बारावी आणि इतरही परीक्षा रद्द केल्या. या निर्णयाने विद्यार्थी आणि पालकांना आनंद झाला आहे.

परीक्षा आज किंवा उद्या कधीही घेता येईल, परंतु परीक्षांसाठी मुलांचे आरोग्य किंवा आयुष्य धोक्यात घालणे योग्य नाही. या सर्व धोक्याची जाणीव असूनही यु जी सी मुलांचे आरोग्य ,पर्यायाने समाजाच्या आरोग्याला धोक्यात का घालत आहे, हे समजण्यापलीकडे आहे. कोरोना बाधीतांच्या आकडेवारीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. दिवसेंदिवस ही आकडेवारी चिंताजनक होत आहे. केंद्र व राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल ही काळजी करू नये. कोरोना आटोक्यात आल्यावर त्यावर उपाय योजना करता येईल. शिक्षण तज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील सामाजिक संघटनांचा सल्ला घेवून यावर मार्ग काढता येवू शकतो. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना सरासरी मार्कस आणि अजून अॅडिशनल 10% मार्कस देवून पास करावे, अशी मागणी सुजाण नागरिक मंचातर्फे करण्यात येत आहे.

कोरोनाबरोबरच साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. पावसाळी वातावरण असल्याने डेंग्यू, मलेरिया, सर्दी ताप, न्यूमेनिया यासारख्या आजारांनी थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील सर्व जनता कोरोना आणि साथीच्या आजारांनी त्रस्त झाली आहे. त्यामुळे पालकांबरोबरच विद्यार्थीही आजाराने त्रस्त आहेत. अशातच देशातील आरोग्य संघटनेने ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक होईल असे भाकीत केले आहे. राज्यातील बरेच विद्यार्थी आजाराने ग्रस्त आहेत. शिवाय मोबाईल नेटवर्कची ग्रामीण भागात आणि शहरी भागातहि बोंब आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेणे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणे होवू शकते. अशा वातावरणात परीक्षा घेवून कोरोनाबरोबर साथीच्या आजारांना आमंत्रण मिळू शकते. यासाठी अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि इतर सर्व परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी सुजाण नागरिक मंचाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब दाते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टहास केल्यास सुजाण नागरिक मंचातर्फे मोठे जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा बाळासाहेब दाते यांनी मंचाच्या वतीने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!