आंबेगावातील आदिवासी भागातील ७७१ मुलांनी विविध उपक्रमांनी साजरा केला बालदिन
महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
घोडेगाव : सध्या देशभरात नव्हे तर जगभरात कोरोना विषाणू संसर्ग रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून मुलांच्या शाळा बंद आहेत. शहरी भागात ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षण, मनोरंजन, खेळ, गप्पा, गोष्टी, गाणी यातील मज्जा घेता येत नाही. हा विचार करून शाश्वत संस्थेने गावातील काही तरुण-तरुणींनी, स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले आहे. आदिवासी भागातील १७ वाडयावस्त्यांवर हे वर्ग सुरू असून ७७१ विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा होत असतो. त्यानिमित्ताने बालदिन निबंधस्पर्धा, चित्रकलास्पर्धा, हस्तकला, कोलाजकाम, मातीकाम, भेटकार्ड तसेच किल्ले तयार करणे अशा विविधरंगी कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. यामध्ये आदिवासी भागातील आहुपे, पिंपरगणे, नानवडे, कोंढरे, चिंचेवाडी, ढकेवाडी, पांचाळे, चिखली, इष्टेवाडी, म्हतारबाची वाडी, फलोदे, पिंपरी, पाटण, महाळुंगे येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याविषयी भाषणे केली. यावेळी प्रशासनाने कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते.
याप्रसंगी शाश्वत संस्थेच्या विश्वस्त प्रतिभा तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अरुण पारधी, रवी असवले, सुलोचना गवारी, शांताराम गुंजाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.