आळंदी पंचक्रोशीत सोमवार पासून संचारबंदी ; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
आळंदी पंचक्रोशीत सोमवार पासून संचारबंदी ; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
महाबुलेटीन न्यूज
आळंदी (अर्जुन मेदनकर) : कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहर व पंचक्रोशी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी सोमवार पासून (दि.२८) ते रविवार (दि.४ जुलै) या कालावधीत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. आळंदी परिसरात आषाढी यात्रा पायी वारीस मोठ्या प्रमाणात गर्दी होवू नये यासाठी पोलिस प्रशासनाने संचारबंदीचे आदेश दिले आहे. यामुळे यावर्षीही लाखो भाविक माऊलींचे पालखी प्रस्थान सोहळ्याचे या आनंदसोहळ्यात वंचित राहणार आहेत. मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही श्रींचे पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच वारकरी, मानकरी, भाविकांचे उपस्थितीत २ जुलै ला आळंदी मंदिरातून सायंकाळी सहाच्या सुमारास प्रस्थान होणार आहे. यामुळे वाहन चालकांनी आळंदीकडे न ये-जा करता पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
आषाढी यात्रेस आळंदीत राज्य परिसरातून भाविक येत असतात. यामुळे कोरोंना महामारीचे संकट अधिक वाढू नये याची उपाययोजना करीत गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आळंदी पंचक्रोशीत संचारबंदीचा निर्णय घेवून आदेश जारी केले आहेत.
संचारबंदी आदेशाचे काळात पर्यायी मार्गाचा वापर करून आळंदी मार्गे वाहतूक न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आळंदीत सार्वजनिक व खासगी वाहतूक बंद राहणार असून केवळ आळंदी पंचक्रोशीत अत्यावश्यक वाहने तसेच स्थानिक नागरिकांना आपले ओळखपत्र दाखवून ये-जा करता येणार आहे.
पोलिस प्रशासनाने रहदारीला पुणे – मॅग्जिन फाटा – आळंदी, मोशी-आळंदी फाटा, लोणीकंद फाटा-मरकळ- आळंदी रस्ता, वडगाव घेणंद-आळंदी, चाकण-आळंदी रस्ता, चिंबळी-आळंदी रस्ता हे रस्ते संचारबंदी काळात बंद राहणार आहे. या रस्त्यांना पर्यायी रस्ते असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यातून केवळ अत्यावश्यक सेवेच्या वापराची वाहने, पालखी प्रस्थानला येणार्या मान्यवरांची वाहने वगळण्यात आली आहेत.
आळंदी शहर व पंचक्रोशीतील केळगाव,च-होली खुर्द, चिंबळी, वडगाव घेणंद, कोयळी, धानोरे, सोळु, मरकळ, च-होली बुद्रुक, डूडुलगाव, चोवीसावाडी या गावांमध्ये २८ जून ते ४ जुलै या काळात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली. सांगितले.
● इंद्रायणी नदी घाट भाविकांचे स्नानास बंद :
आळंदीत माऊलीचे पालखी प्रस्थान काळात भाविकांची गर्दी होवू नये तसेच कोरोंना महामारीचे संकट वाढू नये यासाठी पोलिस प्रशासनाने आळंदी पंचक्रोशीत संचारबंदी लागू केली आहे. यामुळे वारकरी , भाविक, नागरिक यांना इंद्रायणी नदीकडे रहदारीस संचारबंदी असल्याने स्नान करता येणार नाही तसेच हात, पाय धुता येणार नाहीत तसेच या परिसरात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
● २ जुलैला आळंदी मंदिरातून माऊली चल पादुकांचे प्रस्थान :-
यावर्षीही पालखी सोहळ्यावर कोरोंना महामारीचे सावट असल्याने केवळ १०० वारकरी यांचे उपस्थितीत माऊलींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान प्रतिकात्मक शासनाचे नियंत्रणात अनेक मार्गदर्शक सूचनांचे वर्षावात होणार आहे. २ जुलै ला चल पादुकांचे हरिनाम गजरात प्रस्थान झाले नंतर पहिला मुक्काम व पुढील मुक्काम १८ जुलै पर्यन्त आळंदी येथील जुना गांधीवाडा , रामवाडा जागेत विकसित केलेल्या दर्शन मंडप आजोळघर जागेत होणार आहे. १९ जुलैला माऊलींचे चल पादुका एसटी बसने पंढरपूरला हरिनाम गजरात २ बस मधील ४० वारकरी यांचे सह मार्गस्थ होणार आहेत.
आळंदी मंदिरात २ जुलैला होणा-या परंपरेच्या धार्मिक कार्यक्रमात घंटानाद, काकडा, पावमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती, विना मंडपात काल्याचे कीर्तन त्यानंतर गाभारा स्वच्छता, श्रींचे समाधीस जलार्पण, महानैवेद्य होणार आहे. दुपारी चारच्या सुमारास पालखी प्रस्थांन सोहळ्यास सुरुवात होणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांनी सांगितले.
०००००