आळंदी पंचक्रोशीत पुणे-नाशिक रेल्वे महामार्ग भूसंपादनासह रिंग रोडला संवाद बैठकीत बाधितांचा विरोध ● खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण यांची संवाद बैठक
आळंदी पंचक्रोशीत पुणे-नाशिक रेल्वे महामार्ग भूसंपादनासह रिंग रोडला संवाद बैठकीत बाधितांचा विरोध
● खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण यांची संवाद बैठक
महाबुलेटीन न्यूज : अर्जुन मेदनकर
आळंदी ( दि. २९ मे ) : येथील आळंदी पंचक्रोशितून पुणे-नाशिक रेल्वे महामार्ग व रिंग रोड प्रस्तावित आहे. या दोन्ही प्रकल्पास येथील बाधित रहिवासी व शेतकरी यांचा प्रखर विरोध असल्याचे बाधित शेतकरी यांनी संवाद बैठकीत सांगितले. खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण यांनी भूसंपादना बाबत सुसंवाद साधला. आळंदीत बधितांची संवाद बैठक प्रांत चव्हाण यांनी आयोजित केली होती.
यावेळी अनेक शेतकरी यांनी या भागातून रिंग रोड व रेल्वे अशा दोन्ही विकास कामासाठी मोजणी व भूसंपादन करू नये. यासाठी आमचा विरोध आहे. यापूर्वी पुनर्वसन जागा आरक्षण कमी झाले नाही. अनेकांच्या जागा आहेत. या भूसंपादनाने अल्प भूधारक शेतकरी यांचेवर अन्याय होणार आहे. अनेक शेतकरी भूमिहिन होणार आहेत. अल्पभूधारक शेतकरी यांचेवर अधिकच अन्याय होणार आहे. तसेच शेतीचे तुकडे पडणार असल्याने शेती ही करता येणार नाही. तसेच अनेकांनी घरे बांधली असून त्यांचेवर देखील खूप अन्याय होईल, असे अनेकांनी हरकत अर्ज देत सांगितले. यामुळे संभाव्य मोजणी व भूसंपादन करू नये, आमचा यास विरोध असल्याचे सांगत बाधित शेतकरी यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी हरकत घेत अनेक जण भूमिहीन होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले.
आळंदी पंचक्रोशीतील जमीन गटांचे भूसंपादन करण्यासाठी शासनाच्या वतीने खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण यांचेसह इतर शासकीय अधिकारी यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. संवाद साधत बाधित शेतकरी यांचे म्हणणे ऐकून घेतले. या बैठकीला फक्त बाधित शेतकरी यांना बोलविण्यात आले होते. आळंदीत येथील बैठकीचे आयोजन कोविड-19 या महामारीचे काळातील शासनाचे आदेश सूचना यांचे पालन करीत आयोजन करण्यात आले. कोरोना महामारी नियमांचे पालन करून इतर नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते.
प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी रेल्वे मार्गाविषयी बाधित शेतकऱ्यांना शासना कडून आलेली माहिती देत संवाद साधला. यात रेल्वे मार्गासाठी जमीन संपादन, शेतकऱ्यांना शासनाचा मोबदला तसेच शेजारी शेतकऱ्यांसाठी सेवा रस्ते याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी उड्डाण पुल बांधणार असल्याचे सांगितले. त्याबाबतचे नकाशे दाखविण्यात आले. यावर येथील बाधित शेतकरी नागरिकांनी आळंदीत शेतकऱ्यांनी रिंग रोडचे भूसंपादन देखील होणार असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यासाठी एकशे दहा मीटर रुंदीचा सर्व्हे करण्यात आलेला आहे. शिवाय आता रेल्वेसाठी ३० मीटर रुंदीचे शेतीचे क्षेत्र संपादन होणार असून संबंधित शेतकऱ्यांच्या शेतामधून पाचशे फूट जमीन संपादन होणार असल्याने अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे रेल्वे आणि रिंग रोड दोन्ही विकासकामांसाठी आम्ही जमीन देणार नाही, असे शेतकरी यांनी सांगितले. दोन्ही प्रकल्पांस आम्ही भूसंपादन होवू देणार नाही, अशा अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी करीत हरकत दिली आहे. यावर प्रांत चव्हाण यांनी शेतकरी यांचे म्हणणे मी वरिष्ठांपर्यंत पोचवतो अशी ग्वाही दिली.
या बैठकीत प्रांत विक्रांत चव्हाण, रेल्वे अधिकारी, मंडलाधिकारी चेतन चासकर, तलाठी विकास नरवडे, उद्योजक सचिन येळवंडे, रवी कुऱ्हाडे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, शिवाजी कुऱ्हाडे यांचेसह बाधित शेतकरी, रहिवासी भाविक उपस्थित होते.