Wednesday, June 25, 2025
खेडनागरी समस्यापुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईविशेष

६५ वर्षांच्या आजी आंदोलन करताना पाण्यात बुडताना वाचल्या…

 

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन दुसऱ्या दिवशीही पाण्यातूनच…
आता आंदोलक गाय-म्हशी जनावरांसह पाण्यात उतरणार…
गावाकडचे लोक मुंबईतही सुरू करणार आंदोलन…
गवारवाडीचे आंदोलक पाण्यात उतरून आंदोलन करताना..

महाबुलेटीन न्यूज / दत्ता घुले
शिंदे-वासुली : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त व जिल्हा प्रशासन यांच्या मध्ये ठरल्याप्रमाणे पुनर्वसनाबाबत कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत आसखेड खुर्द हद्दीतील एक किलोमीटर जलवाहिनीचे काम बंद असणार होते. परंतु जिल्हा प्रशासनाने दडपशाहीच्या मार्गाने पोलीस बंदोबस्तात त्या जलवाहिनीचे काम पुन्हा चालू केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपोषण करून प्रशासनाला विरोध केला आहे. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच असून प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणावर अद्यापही ठाम आहेत तर दुसरीकडे उर्वरित प्रकल्पबाधित शेतकरी जलसमाधी आंदोलनासाठी आक्रमक होत आहेत.

आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधी, महसूल प्रशासन आणि विशेष म्हणजे विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना अजिबात स्वारस्य नसल्याचे दिसते. अजूनपर्यंत कोणीही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी इकडे फिरकले नाहीत. भर पावसात काही शेतकरी उपोषण करत आहेत, तर दुसरीकडे प्रकल्पबाधित तेवीस गावांमध्ये शेतकरी बायका-मुलांसह पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करीत आहेत. या सर्व आंदोलनात पोलीस प्रशासन महत्त्वाची भूमिका बजावत असली तरी प्रकल्पग्रस्तांचा कोणी वालीच उरला नसल्याची खंत प्रकल्पग्रस्त शेतकरी बोलून दाखवित आहे.

६५ वर्षांच्या आंदोलक आजी पाण्यात बुडताना वाचल्या…:-


तेवीस गावांमध्ये चालू असलेल्या जलसमाधी आंदोलनात लहान मुले, महिला, वयोवृद्ध व तरुण शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आज ( दि. २० ) दुपारी बाराच्या सुमारास वहागाव येथील ६५ वर्षांची आज्जी सखुबाई रामचंद्र चांभारे आंदोलनासाठी पाण्यात उतरल्या असता तोल जाऊन बुडता बुडता थोडक्यात वाचल्या. त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या बाकीच्या शेतकऱ्यांनी या आजीबाईंना वाचवलं.

 

जलसमाधी आंदोलकांना वाचविण्यासाठी पोलीस व एनडी आरएफचे जवान तैनात :-

पाण्यात उतरून आत्मबलिदान करू इच्छिणाऱ्या व जलसमाधी आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. रेस्क्यू ऑपरेशन साठी प्रत्येक गावात दहा ते पंधरा पोलीस खडा पहारा देत आहेत. बोटी घेऊन एनडीआरएफचे जवान काम करीत आहेत परंतु प्रकल्पग्रस्त ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. यावेळी काही प्रकल्पग्रस्तांनी ‘गेंड्याचे कातडे पांघरलेल्या शासनाला आणखी ज्ञानेश्वर गुंजाळ सारख्या किती शेतकऱ्यांचे बळी पाहिजेत’. न्यायासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांचा बळी दिल्यावरच शासन दखल घेणार का ? आमचा जलवाहिनीला विरोध नाही, पुणे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याला आमचा विरोध नाही, परंतु तीस वर्षापासून भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रलंबित असणारे प्रश्न आधी सोडवा, मगच पाणी न्या. हा आमचा हक्क आहे, हा आमचा अधिकार आहे. तसेच जलसमाधी आंदोलन करणारे शेतकरी ‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशा घोषणा देऊन शासनाचा निषेध करत आहेत.

उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांच्या तब्येतीची आरोग्य तपासणी करावयास आलेल्या करंजविहीरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना उपोषणकर्त्यांनी तपासणी करण्यास ठाम नकार दिला. आमच्या मागण्या मान्य करा, जलवाहिनीचे काम बंद करा’ आम्ही अगदी ठणठणीत आहोत, असे ठणकावले.

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन आता मुंबईतही…
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचे आंदोलनाचं लोन आता मुंबईतही पोचणार आहे. तेथील मुंबईकर जे मूळचे भाम खोऱ्यातील रहिवाशी असून मुंबईला कामानिमित्त राहतात ते प्रकल्पग्रस्त सुद्धा येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये उपोषणाला बसणार असल्याची माहिती येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दिली.

आता गाय-म्हशी जनावरांसह पाण्यात उतरणार…
काल संध्याकाळपासून जलसमाधी आंदोलन चालू असून रात्री उशिरापर्यंत ते चालू होते. आज सकाळपासून पुन्हा जलसमाधी आंदोलनाला शेतकऱ्यांनी नव्या दमाने सुरुवात केलेली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून आंबोली, आखतुली, वेल्हावळे, टेकवडी, कासारी, शिवे वहागाव, कोळीये, गडद, गवारवाडी येथील शेतकरी वयोवृद्ध माणसं व लहान मुले पाण्यात उतरलेले आहेत. न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असून आंदोलन अजून व्यापक करणार असल्याचे काही प्रकल्पग्रस्तांनी माहिती दिली असून शासनाने योग्य दखल न घेतल्यास गाई-म्हशी जनावरांसह पाण्यात उतरणार असल्याचा खणखणीत इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

दरम्यान पोलीस प्रशासनाने प्रमुख आंदोलकांना १४९ ची नोटीस बजावली असून सोशल मिडियावर इतर प्रकल्पग्रस्तांना जलसमाधी आंदोलन करण्यास उद्युक्त करणे, आंदोलना दरम्यान कोणतीही जीवितहानी अथवा कोणी गैरकृत्य करुन दखलपात्र/अदखलपात्र गुन्हा झाल्यास आपणास जबाबदार धरुन नोटीस भंग केल्याप्रकरणी १८८ अन्वये सक्त कायदेशीर कारवाई करणार असल्याची ताकीद देण्यात आली आहे. परंतु याबाबत आंदोलकांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, हे आंदोलन जनआंदोलन आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन आहे. आम्हाला जबाबदार धरण्यापेक्षा आमची वेळोवेळी शब्दांचा खेळ करून फसवणूक करणाऱ्या शासनाचीच सर्वस्वी जबाबदारी आहे. आम्हीतर अहिंसा मार्गाने उपोषणाला बसून आहे, यासर्व उठाठेवी पेक्षा शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, असे स्पष्ट केले.
——————————

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आनंदोलनाची काही क्षणचित्रे…

कुदळवाडीतील आंदोलक
अनावळे येथील आंदोलक

 

पाईट येथील आंदोलक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!