रामायण, महाभारतात विविध राजांचे दाखले दिले जातात. हे राजे शूरवीर होते, दानशूर होते, न्यायी होते. पण महान, पराक्रमी राज्यांची परंपरा आपल्याला लाभली असली तरी रयतेचा राजा असं म्हटलं की, समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला आणि त्यापुढे जाण्याची कोणाची टाप नाही. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. यानिमित्त महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची ती वैशिष्ट्ये जाणून घेऊ, ज्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने रयतेचा राजा म्हटले जाते…
● रयतेवर जीवापाड प्रेम
——————————-
शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. प्रत्येक मोहिमेनंतर शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना ‘मानकरी’, भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा ‘भालेराव’ अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होवून चढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे.
● निर्भिडपणा आणि जिद्द
———————————
आपल्यापेक्षा प्रबळ शत्रुला शिवाजी महाराज कधीही घाबरले नाही. भय हा शब्द महाराजांच्या ध्यानी-मनीही नव्हता. महाराजांची कार्यपद्धती नेमकी असायची. एखादी मोहीम आखल्यानंतर गड उतार झाल्यापासून ते पुन्हा गडावर येईपर्यंत कशी कामे करायची, याचे व्यवस्थापन चोख असायचे. नियोजन करणे, माहिती गोळा करणे, जबाबदाऱ्या निश्चित करणे, यामुळे शिवाजी महाराजांना मोठे यश मिळाले. जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली.
● दूरदृष्टी
————
महाराजांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते, याचा विचार त्यांच्याकडे होता. स्वराज्य स्थापनेनंतर ते विस्तारले कसे जाईल, याचा ते सदैव विचार करायचे. त्यांनी बांधलेले गडकिल्ले हे याचे उत्तम उदाहरण आहे. हे गडकिल्ले इतके अभेद्य असत की शत्रूला त्यावर चाल करून जाताना हजारदा विचार करावा लागे. किल्ल्यांभोवतीची तटबंदी मजबूत असे आणि त्यासाठी किल्ल्यावर केलेल्या खोदकामांतून मिळालेलेच दगड वापरले जाते. त्यामुळे इतक्या उंचावर इतके अभेद्य किल्ले बांधता आले. शत्रूचा धोका जसा जमिनीवर आहे तसाच तो पाण्याच्या बाजूनेही असू शकतो, या दूरदृष्टीतून त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. हा संपन्न वारसा आजही महाराष्ट्र अभिमानाने मिरवत आहे.
गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या. शत्रूचे सैन्य कितीही प्रचंड असले, तरी काही मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी शत्रूचा पाडाव केला. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले आणि जिंकले. हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांकडे ४०० गड-किल्ले होते, असे सांगितले जाते.
स्वराज्य मिळाल्यानंतरही महाराजांचे विविध खात्यांचे नियोजन करणारे अष्टप्रधान मंडळ हे व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सुमारे ४०० गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते. काही गड त्यांनी स्वतः बांधले, तर काही किल्ले लढाया करून जिंकले. महाराजांचा एक एक गड-किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतिकच होते.
● न्याय आणि सर्वधर्मसमभाव
—————————————-
हिंदू असूनही शिवाजी महाराजांनी मुस्लिमांशी कधीही दुजाभाव केला नाही. आपली लढाई मुस्लिमांच्या धर्माशी नसून, त्यांच्या साम्राज्याशी आहे, असे शिवाजी महाराज नेहमी आपल्या सहकाऱ्यांना सांगत. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात स्त्रियांवर अन्याय, अत्याचार व हिंसाचार करणाऱ्यांना व त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद केली होती. महिलांना त्रास देणाऱ्यांना शिवाजी महाराजांनी कडक शासन केल्याची अनेक उदाहरणे देता येतील. शिवाजी महाराजांच्या दरबारात सुनावणीसाठी आलेले प्रकरण तातडीने, समोरासमोर तडीस नेले जायचे.
————-
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.