महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरुनगर, दि. १९ : तिन्हेवाडी (ता. खेड) येथील शेतकरी खंडू भागाजी आरुडे या शेतकऱ्यानी त्यांच्या खडकाळ जिरायती शेतात शेवगा लागवड केली. शेवग्याला शेंगा लागल्या मात्र कोरोनाचे संकटाने पहिल्याच उत्पन्नावर मोठे संकट कोसळले. लॉकडाउन काळात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने खरेदीला ग्राहक मिळत नव्हते. अशा काळात शेवगा शेंग अगदी कमी दराने विकली जात होती. मात्र आरुडे यांच्या शेवग्याच्या शेंगा या काळातही ३० रुपये प्रति किलो असा बाजार भाव घेत होत्या.
भरपूर गर असलेली हिरवीगार फुगीर शेंग असल्याने त्यांच्या शेवग्याला मागणी वाढली. अलीकडे अनलॉकमुळे बाजारात भाजीपाला विक्री सुरू झाली. शेवग्याला चांगला मोहोर आला, शेंगा लागल्या: मात्र त्याचवेळी निसर्ग चक्रीवादळ झाले आणि यामध्ये शेवग्याच्या झाडाचे मोठे नुकसान झाले. तरीही न डगमगता या झाडांची छाटणी करून नव्या जोमाने त्यांनी झाडांची निगराणी राखून पिकाचा समतोल राखला. आता ही या शेवग्याच्या झाडांना मोहर आला असून शेवग्याच्या शेंगा तयार होत आहेत. बाजारपेठेत या शेवग्याच्या वाणाला जास्त मागणी असल्याने मोठे उत्पन्न मिळणार असल्याचे मत खंडू आरुडे यांनी व्यक्त केले.
खडकाळ जिरायती जमिनीमध्ये शेततळे करून पाण्याचा स्त्रोत निर्माण करून कमीत कमी खर्चात नियोजनबद्ध पद्धतीने लागवड आणि निगा राखत खंडू आरुडे यांनी शेतीमध्ये शेवग्याचे भरपूर भरघोस उत्पन्न घेतले आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील काळाची पावले ओळखून पीक पद्धती बदलावी असा मौलिक सल्ला त्यांनी आपल्या शेती पिकातून दिला आहे. लॉकडाउन व निसर्ग चक्रीवादळ या संकटात शेवग्याची शेती करून तिन्हेवाडी येथील शेतकरी खंडू आरुडे यांनी तालुक्यातील इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
“नियोजनबद्ध लागवड आणि लक्षपूर्वक कष्ट केल्याने शेवग्याच्या शेतीने या शेतकऱ्याला हजारो रुपये मिळवून दिले आहेत. खडकाळ जिरायती जमिनीमध्ये शेततळे करून पाण्याचा स्त्रोत निर्माण करून पाऊण एकर शेतीमध्ये शेवग्याची लागवड केली. शेवग्याचे बियाणे मिळवण्यासाठी यांनी राज्यात अनेक ठिकाणी प्रयत्न केले; मात्र त्यांना ते न मिळाल्याने त्यांनी बाहेरच्या देशातून ऑनलाईन शेवगा बियाणे खरेदी करून नियोजनबद्ध लागवड आणि लक्षपूर्वक निगराणी करून शेवग्याची शेती फुलवली. ”
वीस वर्षांपूर्वी शेतात राहायला आलो. पारंपरिक शेती केली; मात्र त्यामध्ये मनासारखे उत्पन्न मिळत नसल्याने कमी खर्चाचे पीक म्हणून शेवगा शेती करायचे ठरवले. सुरुवातीला चांगले बियाणे मिळाले नाही. नंतर ऑनलाईन पद्धतीने परदेशातून बियाणे मागवून शेवगा शेतीला सुरुवात केली. लॉकडाउन काळात शेवग्याचा पहिला हंगाम सुरू झाला. पाहिजे तसा बाजार भाव मिळाला नाही. आता मात्र बाजारपेठेत भाजीपाला विकायला सुरुवात झाल्याने मोठे उत्पन्न मिळत आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील कमी खर्चात शेवग्याची शेती करून भरघोस उत्पन्न मिळवावे. – खंडू भागाजी आरुडे ( शेवगा उत्पादक शेतकरी )
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.