अडचणीतील साखर उद्योगासमोर इथेनाॅल निर्मिती हा उत्तम पर्याय : हर्षवर्धन पाटील

महाबुलेटीन नेटवर्क : शैलेश काटे
इंदापूर : “साखर उत्पादनावर न थांबता उपपदार्थ निर्मिती केली तरच साखर कारखान्यांसमोरच्या अडचणी दूर होवून, ऊस उत्पादकांना चांगला दर देणे शक्य होणार आहे. त्यासाठी इथेनाॅल निर्मिती हा उत्तम पर्याय आहे,” असे मत माजी मंत्री व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आज ( दि.१३ जुलै ) व्यक्त केले.
कर्मयोगी सहकारीच्या इथेनॉल साठवण टाक्यांच्या उभारणीचा भुमिपुजन समारंभ त्यांच्या हस्ते व कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी पाटील बोलत होते.
ते म्हणाले की, “बदलत्या परिस्थितीनुसार स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी साखर कारखानदारीत बदल करणे अपरिहार्य झाले आहे. वेगवेगळ्या कारणाने साखर उद्योग अडचणीत येत आहे. साखरेचे साठे कारखान्याच्या गोदामात पडून आहेत. त्यावरील बँकांचे व्याज वाढतच जात आहे. साखर उत्पादनावर अवलंबून न रहाता साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीकडे वळणे गरजेचे आहे.
कर्मयोगी सहकारीचे संस्थापक दिवंगत शंकरराव पाटील यांनी काळाची पावले ओळखून इथेनाॅल निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली होती”, असे सांगून पाटील म्हणाले की, “साखर उद्योगासमोरील अडचणी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून इथेनाॅल संदर्भात तीन नाविन्यपूर्ण योजना आणल्या. त्यामुळे साखर कारखानदारांना प्रगतीची नवी संधी मिळाली आहे,” असे पाटील म्हणाले.
सध्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याकडे तीस हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प सुरु आहे. चालु हंगामात त्यामध्ये तीस टक्के म्हणजे सुमारे चाळीस हजार लिटर प्रतिदिन वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे सत्तर लाख लिटर इथेनॉल निर्मिती होणार आहे. आरएम व इएनएसह एकूण उत्पादन एक कोटी तीस लाख लिटरपर्यंत जाणार आहे”, असे ते म्हणाले.
भविष्यात आसावनी प्रकल्पाची वाढ करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आवश्यक इथेनॉल साठवण टाक्यांच्या उभारणीचा भुमिपुजन समारंभ आज आयोजित करण्यात आला, असे सांगून ते म्हणाले की, “पेट्रोलियम विस्फोटक सुरक्षा संस्थेच्या नियमानूसार प्रत्येकी साडेसात लाख लिटर क्षमतेच्या तीन टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे. साडेबावीस लाख लिटर इथेनॉलची साठवण होणार आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार इथेनॉलचा पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापर होणार आहे.”
सध्या बी हेवी मोलासिस व सिरपपासून इथेनॉल निर्मितीस परवानगी मिळाली आहे. त्याचे दर ही चांगले आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, जेवढी इथेनॉल निर्मिती होईल तेवढी उचल होणार आहे. बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती केल्यास साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे साखरेच्या अतिरिक्त साठ्यावर मर्यादा येणार आहे. साखर साठवणुकीची अडचण दूर होणार आहे. साखरेच्या साठ्यावरील बँकेचे व्याज कमी होणार आहे. बी हेवी मोलॅसिसपासुन इथेनॉल निर्मित केल्याने वाफ व वीजेची बचत होणार आहे. पर्यायाने साखरेचा उत्पादन खर्च कमी होणार आहे, असे ते म्हणाले. कारखान्याची गाळप क्षमता वाढून साखरेच्या दर्जा अधिक सुधारणार आहे. फक्त साखर निर्मिती करण्यापेक्षा बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती केल्यास साखर उत्पादन खर्चात बचत होऊन कारखान्यास अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. भविष्यामध्ये कारखान्याचा आर्थिक फायदा होणार आहे. त्यांचा सभासदांना फायदा होणार आहे”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. जी. सुतार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास संचालक भरत शहा यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.