महाबुलेटीन न्यूज
नारायणगाव, दि १८ (किरण वाजगे) : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे काम राष्ट्रवादी पक्ष करीत आहे. राष्ट्रवादीचा हा कुटील डाव आपण हाणून पाडू, असा इशारा शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नारायणगाव येथे दिला. नारायणगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुका शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शन उपनेते शिवाजीराव आढळराव यांनी केले.
याप्रसंगी माजी आमदार शरद सोनवणे, तालुका प्रमुख माउली खंडागळे, नगराध्यक्ष शाम पांडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, संभाजी तांबे, दिलीप डुंबरे, शरद चौधरी, मंगेश काकडे, सरपंच योगेश पाटे, संतोष वाजगे, धनंजय डुंबरे, विविध गावाचे सरपंच, सदस्य, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
राष्ट्रवादी पक्षाकडून जाणून-बुजून अनेक ठिकाणी पक्षात फुट पाडण्याचे काम केले जात आहे. काही पदाधिकारी यांना मारहाण, खोटे गुन्हे दाखल केले जात असेल तर खपवून घेतले जाणार नाही. आपण १५ वर्ष लोकप्रतिनिधी आहोत, असे असताना विधानपरिषदेच्या निवडणुकीत आपल्याला विचारले गेले नाही, अशी खंत व्यक्त करीत पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार, अशी घोषणा देखील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नारायणगाव येथे केली.
आढळराव पाटील म्हणाले की, राज्यात आघाडी आहे म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आघाडी होईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना वाटत होती. पण स्थानिक राजकारण लक्षात घेता ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढविल्या जातील. आणि सर्व शिवसैनिकांच्या पाठीशी शिवसेना पक्ष खंबीरपणे मागे उभी राहील. असा विश्वास व्यक्त करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना समाजकारण आणि राजकारणात आणण्याचा हा पाया असून ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे, गेल्या निवडणुकीत जुन्नर तालुक्यात ६६ पैकी ४२ ग्रामपंचायती ताब्यात होत्या, या निवडणुकीत ५० हुन जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व राहील, असा विश्वास आढळराव यांनी व्यक्त्त केला.
माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले की, महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेनेला विश्वासात घेत नाही अशी खंत व्यक्त केली. तालुक्यात राष्ट्रवादीकडून शिवसेनेत फुट पाडण्याचे छुपे डावपेच सुरु आहे. महाविकास आघाडी टिकेल का नाही यापेक्षा पक्ष संघटना बळकट करा, असे आवाहन सोनवणे यांनी केले.
तालुका प्रमुख माउली खंडागळे म्हणाले की, तालुक्यात ६६ पैकी ४२ ग्रामपंचातीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. महाविकास आघाडीच्या धोरणांनुसार ग्रामपंचायत पातळीवर जागा वाटप न झाल्यास शिवसेना स्वबळावरच लढणार आहे.
यावेळी मंगेश काकडे, धनंजय डुंबरे, योगेश पाटे, शाम पांडे, प्रकाश शेटे, पांडुरंग गाडेकर, सह्याद्री भिसे, उत्तम काशीद यांनी विचार व्यक्त्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय वाव्हळ यांनी केले, तर महेश शेळके यांनी आभार मानले.
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.