आर्टिकल

आर्टिकल : कोरोनाच्या निमित्ताने… ‘अजूनही वेळ गेलेली नाही….’

आर्टिकल : कोरोनाच्या निमित्ताने…
‘अजूनही वेळ गेलेली नाही….’

महाबुलेटिन न्यूज नेटवर्क : (शिवाजी आतकरी)
कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे. गतवर्षीच्या पहिल्या लाटेपेक्षा मृत्युदर प्रचंड वाढलेला आहे. वयस्कर व्यक्तींसोबतच आता तरुण लेकरंही जगाचा निरोप घेत आहेत. सायरन वाजवत शांतता भंग करीत जाणाऱ्या अँब्युलन्स काळजाचा ठोका चुकवत आहेत. क्षणार्धात होत्याचे नव्हते होत आहे. हसते खेळते कुटुंब शून्यात जमा होत आहे. मृत्यू तांडव लक्षात घेता हा कसोटीचा आणि आत्मपरिक्षणाचा काळ आहे.

क्षणभंगुर आयुष्याची प्रचिती अवघा समाज घेत आहे. बेभरवाशाच्या या काळात नात्यांमधीन वीण अधिक घट्ट बांधण्याची, एकमेकांना माफ करून हेवेदावे सोडण्याची आणि जे क्षण विधात्याने दिलेत ते सौहार्दपूर्ण जगण्याचे, अशी ही वेळ आहे. एक इंग्रजी वाक्य आहे ‘forget and forgive’, याप्रमाणे म्हणजेच, विसरा आणि माफ करण्याची ही वेळ आहे. 

काळ अतिशय वाईट आहे. कोरोनाने थैमान घातले आहे. मृत्यूचे तांडव सुरू आहे. सारं काही अशाश्वत आहे. हे कोरोनाने सिद्ध केले आहे. कोरोना उपचारांसाठी उपलब्ध वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. कोरोनावर उपलब्ध औषधोपचार पहाता डॉक्टरांना मिळणारे यश कमी आहे. उपचारांसाठी लागणारे वैद्यकीय क्षेत्रातील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे बेड आता कमी पडू लागले आहेत. किंबहुना उपचारांसाठी हे सर्व वेळेत उपलब्ध होईलच याची शाश्वती उरली नाही. सारे कसे रामभरोसे झाले आहे. ज्यांना बेड अथवा वैद्यकीय सुविधा वेळेत मिळतात ते नशीबवान ठरत आहेत. मात्र इतरांचे उपचारांअभावी बेहाल आहेत. हॉस्पिटलमध्ये बेड मिळेना, ऑक्सीजन मिळेना, औषधे मिळेना, व्हेंटिलेटर मिळेना अशी असहाय अवस्‍था शेकडो लोक अनुभवत आहे. प्रशासन हतबल आहे. एकूणच वैद्यकीय उपचार याबाबत खात्री उरलेली नाही. वैयक्तिक रोगप्रतिकारक क्षमता महत्त्वाची ठरत आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि रोगप्रतिकारक क्षमता या आधारे अनेकांनी कोरोनाने लोटलेल्या काळ दाढेतून स्वतःस बाहेर काढले आहे.
एकूणच संपूर्ण देश महामारीशी दोन हात करीत आहे. सध्यातरी तुटपुंज्या आयुधांवर ही लढाई सुरू आहे. काय गमावले जाणार याची मोजदाद करणे अवघड आहे.

भारतभूमीचे सुपुत्र ‘द ग्रेट’ रतन टाटा यांच्या म्हणण्यानुसार प्राप्त परिस्थितीत जीव वाचवणे हेच महत्वाचे आहे. याचाच अर्थ बाकी सर्व गोष्टी मिथ्या आहेत. खरेतर टाटांचे हे वाक्य सर्वार्थाने सर्वव्यापी आहे. इथे गरीब-श्रीमंत, जाती-पातीचा विषय उरत नाही. यातून सकारात्मक विचार घेऊन प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे, असेच म्हणावेसे वाटते. खरे तर प्रतिकूल परिस्थितीने आत्मपरीक्षण करायला लावले आहे. आयुष्य जर आळवावरच्या पाण्यासारखे बेभरवाशाचे झाले असेल, तर आत्मपरिक्षणाची ही संधी असल्याचे समजायला हवे. 

होय, हीच ती वेळ आहे, दुरावल्या नात्यांना सांधण्याची. हीच ती वेळ नात्यांची वीण अधिक घट्ट करण्याची. परस्परांवरील राग सोडण्याची आणि एकमेकांची माफी मागून हातात हात गुंफण्याची. जातीभेदाच्या आणि प्रांतवादाच्या पलीकडे जाण्याची हीच वेळ आहे. सकारात्मक राजकारण विश्वस्त म्हणून करण्याची. होय, हीच ती वेळ आहे वाईट दिवसात सौहार्द दुरुस्त करण्याची! क्षमा विरस्य भूषणम, हे संस्कृत वाक्य व्यापक अर्थाने सांगते की, क्षमा करणे हे खऱ्या वीराचे भूषण आहे. खरा पुरुषार्थ क्षमा करण्यात आहे. दुर्बल मनाचे लोक क्षमा करू शकत नाही. हीच ती वेळ आहे मन उदार आणि खंबीर करण्याची. एक गीतकाराने सुंदर लिहिले आहे,
‘भले बुरे जे घडून गेले,
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर….’ 

खरेच, विसरून जाण्याची, माफ करण्याची कोरोनाने एक संधी दिली असावी. कोणाच्या पश्चात किंवा आपल्या पश्चात कोणाची हळहळ व्यक्त होण्यापेक्षा, स्वतःपासून दुरुस्तीला सुरुवात करू.
——–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 weeks ago

This website uses cookies.